भा.रि.प बहुजन महासंघाचे घंटानाद आंदोलन

pali
pali

पाली (रायगड) : भिमा कोरेगाव हल्ल्याचे मुख्य सुत्रधार असा आरोप असलेले संभाजी भिडे यांना त्वरीत अटक करण्यात यावी या मागणीकरीता भा.रि.प बहुजन महासंघाच्या वतीने पाली-सुधागड तहसिल कार्यालयासमोर मंगळवारी (ता. 3) घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी भा.रि.प बहुजन महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष मंगेश वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली तहसिलदार बि.एन. निंबाळकर यांना निवेदन देण्यात आले. 

भा.रि.प बहुजन महासंघाचे रायगड जिल्हाध्यक्ष दिपक मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्ह्यात घंटानाद आंदोलन झाले. याला बहुजन समाजातून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. राज्य सरकारने घेतलेल्या झोपेच्या सोंगामुळे सरकारला जागे करण्यासाठी आज बहुजन समाज रस्त्यावर उतरला आहे. सुधागडसह रायगड जिल्हा व राज्यभरात घंटानाद आंदोलन करण्यात आले. असे आंदोलन कर्त्यांकडून सांगण्यात आले. 

यावेळी तहसिलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेल्या निवेदनात भीमा कोरेगाव हल्ल्याचे मुख्य सुत्रधार संभाजी भिडे यांना त्वरीत अटक करण्यात यावी या प्रमुख मागणीसह भीमा कोरेगाव हल्ला प्रकरणातील बहुजन बांधवांवरील सर्व गुन्हे मागे घ्यावेत. ओ.बि.सी,  व्ही.जे.एन.टी, एस.बी.सी विद्यार्थ्यांची थकीत शिष्यवृती त्वरीत अदा करावी, टि.आय.एस.एस विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात, शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करावा, आदिवासींचे स्थलांतर रोखण्यासाठी स्थानिक ठिकाणी रोजगार निर्माण करावा, बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करुन द्यावा, वाकण पाली खोपोली मार्ग रुंदीकरण बाधीत शेतकर्‍यांना योग्य मोबदला द्यावा आदी मागण्यांचा समावेष होता. यावेळी घोषणा व घंटानादाने संपुर्ण परिसर दणाणून निघाला होता.

यावेळी मार्गदर्शन करताना मंगेश वाघमारे म्हणाले की भिमा कोरेगावचा भ्याड हल्ला पुर्वनियोजीत होता. या हल्ल्याचे मुख्य सुत्रधार मनोहर उर्फ संभाजी भिडे यांना अटक करण्यास सरकार जाणीवपुर्वक टाळाटाळ करीत आहे. आंबेडकरी व मराठा बहुजन समाजात मोठी दंगल घडवून आणण्याकरीता भिमा कोरेगाव दंगल घडवून आणली असल्याचे वाघमारे म्हणाले.

सद्यस्थीतीत ऍट्रोसिटी ऍक्ट कायदा शिथील करुन मागासवर्गीय घटकाच्या संरक्षण कवचाला तडा दिला आहे. परिणामी आदिवासी बांधवांसह मागासवर्गीयांवर हल्ले करण्यासाठी रान मोकळे झाले असल्याचा आरोप वाघमारे यांनी यावेळी केला.  विद्यमान सरकारच्या राजवटीत प्रत्येक समाजघटक अस्वस्थ आहे. त्यामुळे येणार्‍या 2019 च्या निवडणुकीत संविधानाने दिलेल्या मतदानाच्या बहुमुल्य अधिकाराचा योग्य वापर करा असे आवाहन मंगेश वाघमारे यांनी केले.  

या घंटानाद आंदोलनात भा.रि.पचे जिल्हा उपाध्यक्ष मंगेश वाघमारे, प्रभाकर शिंदे, नारायण जाधव, रमेश जाधव, भिम महाडीक, लक्ष्मण वाघमारे, राहूल गायकवाड, रोहिणी जाधव, वंदना गायकवाड, अस्मिता कांबळे, सुरेखा जाधव, अल्पेश जाधव, नारायण जाधव, राहूल, गायकवाड, आनंद जाधव, संतोष वाणी, लक्ष्मण वाघमारे आदिंसह भिम अनुयायी, धम्मबांधव मोठ्या संख्येने उपस्थीत होते.  भा.रि.प बहुजन महासंघाच्या वतीने देण्यात आलेले निवेदन रायगड जिल्हाधिकारी यांच्यामार्फत सरकारदरबारी पोहचविण्यात येईल अशी ग्वाही तहसिलदार बि.एन. निंबाळकर यांनी दिली.  दरम्यान कोणताही अनुचीत प्रकार घडू नये याकरीता पाली पोलीस निरिक्षक दशरथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाली तहसिल कार्यालय व परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com