महाड - मुंबई-गोवा महामार्गावर दासगावजवळ ऍसिटिक ऍसिड भरलेला टॅंकर उलटल्याने वाहतूक दोन तास ठप्प झाली. अपघातात तीन जण जखमी झाले. ऍसिडची मोठ्या प्रमाणात गळती झाल्याने नागरिकांनी घाबरून तेथून पळ काढला.
ऍसिटिक ऍसिड भरलेला टॅंकर चेंबूरहून महाड औद्योगिक क्षेत्रातील लक्ष्मी ऑरगॅनिक कारखान्याकडे येत होता. सकाळी आठ वाजता चालकाचा ताबा सुटल्याने दासगाव येथील वळणावर कठड्याला धडकून तो उलटला. यात सचिन पयेलकर, संदीप जाधव आणि टॅंकरचा चालक राजभान हे तिघे गंभीर जखमी झाले. तब्बल दोन तासांनंतर ऍसिडची तीव्रता कमी करण्यात कंपनीच्या सुरक्षा अधिकाऱ्यांना यश आले. ऍसिडवर चुना टाकून त्याची तीव्रता कमी करण्यात आली.
टॅंकर उलटल्यानंतर काही वेळातच ऍसिडची गळती सुरू झाली. नागरिकांना श्वसनाचा त्रास सुरू झाला. काहींना उलट्या, डोकेदुखीचाही त्रास झाला. परिसरातील नागरिकांनी काही विचार न करता घरातून पळ काढला. शाळा, बॅंक आणि टपाल कार्यालय तातडीने बंद करण्यात आले.
|