अडीच वर्षांत जिल्ह्याचा विकास कासवगतीने

अडीच वर्षांत जिल्ह्याचा विकास कासवगतीने

कणकवली - पालकमंत्र्यांचा कारभार जिल्ह्याला दिशाहीन करणार असून गेल्या अडीच वर्षांत जिल्ह्याचा विकास दहा वर्षे मागे गेला. निधी आणला तर तो आहे कोठे? विकास कासवगदीने सुरू आहे. या जिल्ह्याच्या विकासाची गती वाढण्यात दीपक केसरकर कमी पडत असल्याने त्यांनी आपल्या पालकमंत्रिपदाचा राजीनामा देऊन जिल्हा विकासाला हातभार लावावा, अशी टीका जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी आज पत्रकार परिषदेत केली. 

ते म्हणाले, ‘‘जलयुक्त शिवार योजनेत गाव निवडताना प्रशासनाने आपल्या सोयीचे गाव निवडले. नदी पात्रातील गाळ काढण्यासाठी कोणतीही यंत्रणा नाही. यासाठी नको त्या अटी लादून कोणतीही यंत्रणा पुरविली जात नाही. महसूल विभागावर केसरकरांचे नियंत्रण नाही. त्यामुळे गेल्या दोन वर्षात संगणकीकृत सात-बारा आणि अभिलेखाचे काम पूर्ण झाले नाही. गावातील तलाठ्यांकडून वारस तपासाच्या नोंदी घातल्या जात नाहीत. शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचे सात-बारा मिळत नाहीत. ऑनलाईन सात-बारासाठी प्रभावी यंत्रणा उभारलेली नाही. जिल्ह्याच्या विकासासाठी एमआरईजीएसमधून कोट्यवधीची कामे होऊ शकतात. परंतु प्रशासन ही योजना राबवत नाही. सिंचनाच्या बाबतीत गेल्या अडीत वर्षात एक रुपयाचा निधी न आल्याने धरणांची कामे ठप्प आहेत. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारकडून अच्छे दिन येतील, असे सकारात्मक पाऊल पडलेले दिसत नाही.

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा सरकारने केली होती; मात्र भात गोडाऊनमध्ये गेल्या वर्षीपासून पडून आहे त्याची उचल न झाल्याने यंदा भात खरेदी केले जात नाही. त्यामुळे पालकमंत्र्यांकडून जनतेची दिशाभूल सुरू आहे.

विकासकामांबाबत पालकमंत्र्यांनी थापा मारण्याचे काम थांबवावे. विकासकामे जमत नसतील तर त्यांनी स्वतःहून पद सोडावे. जिल्ह्याच्या विकासास हातभार लावावा.’’ मागेल त्याला शेततळी दिली जात असली तरी अशा तळ्यांना पिचिंगचे बांधकाम आवश्‍यक आहे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. 

राज्यातील मंत्र्यांचा पिकनिक स्पॉट
उन्हाळी हंगामात सरकारमधील मंत्र्यांनी सिंधुदुर्गचे दौरे आयोजित केले. ते सर्व दौरे आपल्या कुटुंबासोबत होते. सरकारी पैशातील हे सर्व दौरे जिल्ह्याच्या पर्यटन स्थळापुरते मर्यादित होते. मंत्री पर्यटक म्हणून आले आणि जिल्ह्यातील जनतेच्या डोळ्यात धूळ फेकून गेले, असेही श्री. सावंत म्हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com