रायगड: एकाच कुटुंबातील तिघांचा विजेचा शॉक लागून मृत्यू

dead body
dead body

पाली : सुधागड तालुक्यातील मजरे जांभुळपाडा येथे एैन गणेशोत्सवात विजेचा शाॅक लागून एकाच कुटूंबातील तिघांचा मृत्यू झाला. हि घटना शुक्रवारी(ता.25) पहाटे पाच वाजताच्या सुमारास घटली. घरातील कपडे वाळत टाकलेल्या तारेतून विद्यूत प्रवाह गेल्याने त्याचा शाॅक लागून पिता पुत्रासह नातीचा मृत्यू झाला.

मजरे जांभुळपाडा येथील बाजीराव मालुसरे (वय.65) यांचा मुलगा सचिन मालूसरे (वय.35) व बाजीराव मालुसरे यांची नात विकिता दळवी (वय. 21) या तिघांचा शॉक लागून मृत्यू झाला. याबाबत सविस्तर माहिती अशी की बाजीराव मालुसरे यांच्या घरात गणेशमुर्तीची प्रतिष्ठापना होणार होती.त्यानिमित्त घरातील सर्वच मंडळी पहाटे लवकर उठली होती.बाजीराव मालुसरे हे पहाटे पाच वाजता आंघोळ आटपून आल्यानंतर स्वयंपाकघरात तारेवर वाळत घातलेला टॉवेल घेत होते. त्यावेळी त्यांना विजेचा शॉक लागल्याने ते खाली कोसळले. यावेळी त्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐंकून त्यांची नात (मुलीची मुलगी) विकिता दळवी त्या ठिकाणी आली.तीने बाजीराव मालुसरे यांना उचलण्याचा प्रयत्न केला.त्यावेळी तीला देखील विजेचा जोरात शॉक लागून ती देखील तेथे चिकटून राहिली. त्यानंतर बाजीराव मालुसरे यांचा मुलगा सचिन हा वडील व पुतणीला वाचविण्यासाठी धावून आला. त्याने ती तार काढण्याचा प्रयत्न केला असता त्याला देखील विजेचा जबरदस्त शॉक लागला. विजप्रवाह बंद करुन तिघांनाही उपचाराकरीता पालीतील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणले असता त्यांना डॉक्टरांनी मृत घोषीत केले.

या घटनेची माहिती मिळताच विजवितरण कर्मचार्‍यांसह पोलीस घटनास्थळी पोहचले. पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल गायकवाड व पोलीस निरिक्षक दशरथ पाटील तातडीने घटनास्थळी पोहचले. पुढील तपास पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक दशरथ पाटील करीत आहेत.

गुरुवारी रात्रीपासून सुधागड तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे बाजीराव मालुसरे यांच्या घराला व घरातील आतील बाजूचे पत्रे व लोखंडी पाईप यांना ओल आला होता. घरात गणपतीच्या आदल्या दिवशी ट्यूब बसविण्यात आली होती. या ट्यूब लाईटच्या बाजूने कपडे वाळत घालण्याकरीता तार बांधलेली होती. यावेळी येथील तारेमध्ये विद्युत प्रवाह वाहु लागला. ही बाब कोणाच्याही लक्षात न आल्यामुळे एवढी मोठी दुर्घटना घडली.

सणासुदीचे दिवस सुरु आहेत. गणेशोत्सवानिमित्त अनेकजन सजावटीसह विद्युत रोशनाई करतात. विद्यूत रोशनाई आणि विजेची जोडणी करत असताना प्रत्येकाने खबरदारी घेणे गरजेचे आहे. विजेची जोडणी अधिकृत वायरमनकडून करुन घ्यावी किंवा केलेल्या विजजोडणीची पाहणी वायरमेनकडून करुन घ्यावी. विज सबंधीत दुर्घटना घडल्यास नागरीकांनी विजपुरवठा खंडीत करण्याकरीता सुक्या लाकडाचा वापर करावा. पावसाळा सुरु असल्याने नागरीकांनी विजपुरवठा आणि विजेची उपकरणे हाताळताना अधिक दक्षता घ्यावी.
- अमोल गायकवाड, पोलीस उपविभागीय अधिकारी, रोहा-रायगड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com