मिऱ्या बंधारा तीन ठिकाणी वाहिला; दोन भाग खचले 

मिऱ्या बंधारा तीन ठिकाणी वाहिला; दोन भाग खचले 

रत्नागिरी - अमावस्येच्या उधाणाला काय होणार, या विचाराने मिऱ्यावासीयांच्या पोटात गोळा आला आहे. दोन दिवसांतच मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचा तीन ठिकाणचा भाग वाहून गेला आहे, तर दोन ठिकाणी बंधारा खचण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे येथील रहिवासी भीतीच्या छायेत आहेत. 

नगराध्यक्ष राहुल पंडित, गटनेते बंड्या साळवी, नगरसेवक बाबा नागवेकर यांनी घटनास्थळाला भेट दिली. पतन आणि मेरीटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली; परंतु त्यांनी निधी नाही सांगत हात वर केले. निधी नाही म्हणून लोकांना मरणाच्या दारात सोडायचे काय, असे विचारत त्यांनी तातडीने उपाययोजना करण्याची ताकीद दिली. 

दरवर्षीप्रमाणे या वर्षीही मिऱ्यावासीयांना जीव मुठीत घेऊन आणि रात्र जागून काढावी लागत आहे. रविवारी अमावस्या असल्याने या दिवशी उधाणाचाची मोठी भरती येईल. दोन दिवस आधीच त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. कालपासून समुद्राच्या भरतीने भाटीमिऱ्या, पांढरा समुद्र आदी भागातील धूपप्रतिबंधक बंधारा तीन ठिकाणी वाहून गेला. अजस्त्र लाटांनी मोठ मोठे दगड गिळंकृत केले आहेत. आणखी काही ठिकाणचा भाग खचला आहे. त्यामुळे तो भाग कधीही वाहून जाण्याची भीती आहे. आजच्या उधाणामुळे या भागातील रहिवाशांच्या घराशेजारच्या बागेत समुद्राचे पाणी आले. खचलेला भाग वाहून गेला तर समुद्राचे पाणी थेट घरात शिरण्याची शक्‍यता आहे. 

स्थानिक नगरसेवक बाबा नागवेकर यांनी पालिकेत ही व्यथा मांडली. नगराध्यक्ष, बंड्या साळवी, मधुकर घोसाळे, श्री. मांडेकर यांनी बंधाऱ्याला भेट दिली. या वेळी पतन आणि मेरीटाईम बोर्डाचे अधिकारी उपस्थित होते. मेरीटाईम बोर्ड किंवा पतन विभागाने तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी श्री. पंडित आणि श्री. साळवी यांनी केली. त्यावर तातडीच्या दुरुस्तीसाठी निधी नाही, असे दोन्ही अधिकाऱ्यांनी सांगितले. या बंधाऱ्याचे काम कोणत्या ठेकेदाराने केले होते, त्याला तीन वर्षे झाले नाहीत, दुरुस्तीची त्याची जबाबदारी आहे. हाती असलेला निधी वळवून तातडीने दुरुस्ती करा, असे त्यांनी सांगितले. 

आम्ही जीव मुठीत धरून जगतो 
मिरकरवाड्यातील लोकांना वाचविण्यासाठी तेथे ब्रेकवॉटर वॉल बांधण्यात आली; पण तीच आमच्या मुळावर आली. मिरकरवाडा वाचविण्यासाठी मिऱ्यावासीयांना उद्‌ध्वस्त करण्याचा घाट घातला आहे. मिऱ्या बंदर नैसर्गिक आहे, त्याचा विकास का केला जात नाही, आम्ही जीव मुठीत धरून जगतो, अशी संतप्त प्रतिक्रिया तेथील रहिवासी श्री. शिंदे आणि श्री. पेजे यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com