कितीही सदस्य फोडले तरी सेनेचीच सत्ता 

कितीही सदस्य फोडले तरी सेनेचीच सत्ता 

सावंतवाडी - "मळगावात कितीही सदस्य फोडले तरी ग्रामपंचायतीवर सत्ता शिवसेनेचीच येणार आहे. माजी आमदार राजन तेली यांनी वैयक्तिक स्वार्थापोटी मळगावात राजकीय डावपेच सुरू केले आहेत. त्यामुळे आता मळगावच्या जनतेने सावध राहावे', असा आरोप आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेनेचे तालुकाध्यक्ष रुपेश राऊळ यांनी केला. 

या ठिकाणी कितीही सदस्य तेली यांनी फोडले तरी येणाऱ्या काळात शिवसेनेचीच सत्ता येणार आहे हे निश्‍चित आहे. युती होणार की नाही माहिती नाही; परंतु आमची स्वबळावर लढण्याची तयारी आहे, असेही त्यांनी सांगितले. मळगाव ग्रामपंचायत सरपंच गणेशप्रसाद गवस यांच्यासह पाच सदस्यांनी भाजपत प्रवेश केला होता. याबाबत शिवसेनेकडून आज अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आली. या वेळी चंद्रकांत कासार, दिलीप सोनुर्लेकर, देवयानी राऊळ, आनंद देवळी, उर्जिता फेंद्रे, वेदिका सावंत, कृष्णा गावडे आदी उपस्थित होते. 

राऊळ म्हणाले, ""या ठिकाणी भाजपकडून शिवसेनेच्या सदस्यांना फोडण्यात आले आहे. त्यामागे माजी आमदार तेली यांचा मोठा स्वार्थ आहे. मडुऱ्यात तेलींची जमीन आहे आणि कॉंग्रेसमध्ये असताना माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यासोबत तेली सुद्धा मडुऱ्यात टर्मिनस व्हावे, यासाठी आग्रही होते. मात्र, लोकांनी विरोध केल्यामुळे तसेच पालकमंत्री दीपक केसरकर यांनी लोकांच्या भावनेला महत्त्व दिल्यामुळे हे टर्मिनस मळगाव येथे झाले. मात्र, अजूनही तेली यांचा स्वार्थ संपलेला नाही. त्यामुळे मळगाव ग्रामपंचायतीला हाताशी धरून त्यांनी पुन्हा एकदा येथील टर्मिनस मडुऱ्यात हलविण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे.'' 

ते पुढे म्हणाले, ""या ठिकाणी फक्त पाच सदस्य भाजप सोबत गेले आहेत. मात्र, अन्य सदस्य आमच्यासोबत आहेत. त्यामुळे त्या सदस्यांच्या माध्यमातून विद्यमान सरपंच पेडणेकर यांच्यावर अविश्‍वास ठराव आणण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. या ठिकाणी पालकमंत्री केसरकर यांनी मळगावसाठी एक कोटी रुपयांचा निधी दिला आहे. असे असताना जर पेडणेकर हे भाजपत जात असतील तर त्यांनी आपला राजीनामा देऊन भाजपच्या तिकिटावर निवडून येऊन दाखवावे. काही झाले तरी येणाऱ्या काळात शिवसेनेलाच यश मिळणार आहे. त्यामुळे कोणी हुरळून जाऊ नये.'' 

पदाचा राजीनामा  दिलाच नाही 
श्री. राऊळ यांनी चतुर्थीपूर्वी राजीनामा दिला होता. याबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले, ""मी राजीनामा दिलाच नाही. केसरकरांच्या विरोधात आपली नाराजी नाही तर त्यांच्या कार्यालयाच्या विरोधात आपली नाराजी होती. ती आता चर्चेअंती दूर झाली आहे. जिल्हाप्रमुखांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी मला कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार मी काम सुरू केले आहे.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com