नव्या वर्षात गोव्याला चला बोटीने

नव्या वर्षात गोव्यात चला बोटीने
नव्या वर्षात गोव्यात चला बोटीने

नव्या वर्षात मुंबई-गोवा बोट सेवा

रत्नागिरी : मुंबई-गोवा बोट सेवा नवीन वर्षात सुरू होण्याची चिन्हे आहेत. कोकणातील व प्रामुख्याने रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील किनारी भागात राहणाऱ्या चाकरमान्यांसाठी ही सुवार्ताच आहे. मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड यांनी बोट सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी उचल खाल्ली आहे. नवीन वर्षाच्या आरंभीच मुंबई ते जयगड आणि पुढील वर्षी मार्च ते एप्रिलच्या दरम्यान मुंबई ते गोवा अशी बोट सेवा सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.


भाऊच्या धक्‍क्‍यावरून सुटून पार गोव्यापर्यंत जाणाऱ्या बोटींची सवारी बंद होऊन तब्बल 26 वर्षे लोटली आहेत. दरम्यानच्या काळात स्वस्तात चालणारी ही सेवा सुरू करण्याचे काही प्रयत्न झाले. अत्यंत वेगवान आणि महागडी कॅटामरीन सेवाही सुरू करण्याची चाचपणी झाली, मात्र बोट सेवा विस्मृतीतच गेली होती. आता मुंबई पोर्ट ट्रस्ट व मेरीटाईम बोर्डाने याबाबत उत्साह दाखवला असून, विविध जहाज कंपन्यांकडून आलेल्या प्रस्तावांवर विचार केला जात आहे. खासगी जहाज कंपन्यांनी ही सेवा सुरू करण्यात रस दाखवला आहे. नव्याने बोट सेवा सुरू झाल्यावर भाऊच्या धक्‍क्‍यावरून मुंबईतून बोट सुटेल आणि रायगडातील दिघी, रत्नागिरी जिल्ह्यांतील दाभोळ आणि जयगड व सिंधुदुर्गातील विजयदुर्ग आणि मालवण ही बंदरे घेऊन ती पणजीला जाईल. मुंबई मेरीटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, की 1989 साली बोट सेवा पूर्णपणे बंद झाली. श्रीलंकेमध्ये त्या काळात भारतीय शांती सेना तैनात होती. या शांतीसेनेसाठी भारतीय नौदलाने या बोटी ताब्यात घेतल्यानंतर बोट सेवा पूर्णपणे बंद होऊन सध्या तर ती इतिहासजमा झाली होती. त्यानंतर कोकण रेल्वे सुरू झाली. शिवाय मुंबई-गोवा महामार्ग सुधारण्यात आला. गेल्या दहा वर्षात तर हवाई उड्डाण करणे परवडू लागले होते. त्यामुळे मुंबई-गोवा बोट सेवेसाठी मोजावा लागणारा पैसा मध्यम वर्ग, उच्च मध्यमर्गीय लोकांना परवडत नव्हता. यामुळे अपवाद वगळता बोट सेवा सुरू करण्यात फारसा कोणी रस दाखवला नव्हता. मुंबई ते जयगड, अशी सेवा जानेवारीत सुरू होण्याची शक्‍यता असून, ही बोट दिघी आणि दाभोळला थांबेल.

प्रवाशांकडून वाढती मागणी
कोकण रेल्वे व महामार्गावरील वाहतूक असे पर्याय असले तरीही प्रवाशांच्या संख्येत अपवादात्मक अशी वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबई-गोवा नियमित बोट सेवा सुरू करण्याची मागणी फक्‍त पर्यटकच नव्हे तर नियमित प्रवाशांकडूनही केली जात आहे. सुरक्षित, वेगवान आणि परवडणारा प्रवास म्हणून जलवाहतुकीचा पर्याय प्रवाशांना हवा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com