चोरट्या दारूविक्रीचे नवे रॅकेट

चोरट्या दारूविक्रीचे नवे रॅकेट

जिल्ह्यातील स्थिती - गोवा बनावटीच्या दारूचा महापूर; पोलिसांपुढे आव्हान

सावंतवाडी - अधिकृत दारू विक्री बंद झाल्यानंतर जिल्ह्यात सद्य:स्थितीत गोव्यातील बनावट दारूचा महापूर आलेला दिसत आहे. यासाठी काही रॅकेट कार्यरत झाली आहेत. गोव्यात कमी किंमतीला मिळणारी दारू या ठिकाणी चढ्या भावाने विकली जात असल्याचे चित्र आहे.

दरम्यान, अधिकृत बारबाबत योग्य तो निर्णय न झाल्यास हा प्रकार आणखीनच वाढण्याची शक्‍यता बार मालकांकडून व्यक्त केली जात आहे; मात्र या सर्व परिस्थितीत बनावट दारू पिऊन जीवितहानी होण्याचे प्रमाणे वाढण्याची भीती सर्वसामान्यांकडून व्यक्त केली जात आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महामार्गावरील बरेचसे बार बंद झाले आहेत. मुळात दारू विक्री हा व्यवसाय पर्यटक तसेच वाहन चालकांवर अवलंबून असल्यामुळे तो महामार्गाला लागूनच केला जातो; मात्र अचानक झालेल्या या निर्णयामुळे अनेक बार बंद करण्याची वेळ बार मालकावर आली. त्यांना त्याचा फटका बसला असला तरी रोजच्या नशेसाठी बार शोधणाऱ्या तळीरामांची पंचायत झाली. त्यांना दारू मिळत नाही हे लक्षात आल्यानंतर गोव्यात कमी किमतीत मिळणारी गोवा बनावटीची दारू मोठ्या प्रमाणात सद्य:स्थितीत जिल्ह्यात आणली जात आहे. त्यासाठी काही रॅकेट कार्यरत आहे. आणि कमी किमतीला आणण्यात येणारी ही दारू चढ्या भावाने या ठिकाणी विकली जात आहे. या सर्व परिस्थितीत सहज दारू मिळत असल्यामुळे सांगितलेली किंमत देऊन तळीरामांकडून ही दारू खरेदी केली जात आहे. शहरात काही लोकांकडून अशा प्रकारची दारू विकली जात आहे. ती दारु पिल्यानंतर दुसऱ्या दिवशी चक्कर येणे, डोके जड होणे तसेच अस्वस्थ वाटणे आदी शारिरिक व्याधी निर्माण होत आहे. यात अधिकृत बार चालविणाऱ्या लोकांनी दिलेल्या माहितीनुसार नशा करणारी व्यक्ती आपल्याला नशा मिळण्यासाठी कोणत्याही थराला जावू शकते. याचाच फायदा घेवून बनावट दारू विकली जात आहे. शासनाकडुन अधिकृत दारुवर बंदी घालण्यात आल्याने बनावट दारु विकणाऱ्या तळीरामांचे फावले आहे. आणि ही परिस्थिती अशीच सुरू राहील्यास बनावट दारू पिऊन दगावणाऱ्या लोकांच्या संख्येत वाढ होणार असल्याची भिती व्यक्त होत आहे. त्यामुळे याबाबत योग्य शासनाकडुन योग्य तो निर्णय होणे अपेक्षित आहे असे सर्वसामान्यांसह बार चालक मालकांचे म्हणणे आहे.

न्यायालयाच्या निर्णयामुळे बार बंद पडले आहेत. यामुळे त्याचा फटका येथील पर्यटनावर आणि थेट कामगारांवर होणार आहे. बार हॉटेलमध्ये काम करणारे अनेक कामगारांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे बार सुरू करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून योग्य तो निर्णय घेणे अपेक्षित आहे. अन्यथा बनावट दारूच्या माध्यमातून जीवितहानी होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे लोकांना अधिकृत दारू मिळावी यासाठी बार सुरू व्‍हायला हवेत. 
- शिवराम दळवी, माजी आमदार तथा हॉटेल व्यावसायिक

न्यायालयाच्या निर्णयानंतर अनेक बार बंद झाले आहेत. जिल्ह्यातील २८८ पैकी फक्त ५२ बार सुरू आहेत. यामुळे नशा करणाऱ्या लोकांना दारू मिळत नसल्यामुळे ते बनावट दारूच्या आहारी जाण्याची भीती नाकारता येत नाही. त्यामुळे याबाबत योग्य ती भूमिका शासनाने घेतली पाहिजे. अन्यथा उद्या जीवितहानी होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.
- जितू पंडित, खजिनदार, विदेशी मद्य विक्रेता संघटना, सिंधुदुर्ग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com