मालवण - कॉंग्रेसच्या संघर्ष यात्रेबाबत आपल्याला कोणतीही माहिती नाही; मात्र जिल्ह्यात संघर्ष यात्रा आल्यास त्यात सहभागी होणार आहे, असे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
जिल्ह्यात टंचाईच्या समस्येमुळे टॅंकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ असून, ती पांढऱ्या पायाच्या सत्ताधाऱ्यांमुळेच आली असल्याची टीकाही त्यांनी या वेळी केली. मालवण दौऱ्यावर आलेल्या श्री. राणे यांनी नीलरत्न बंगल्यावर पत्रकारांशी संवाद साधला.
श्री. राणे म्हणाले, 'कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण संघर्ष यात्रा काढत आहेत; मात्र या यात्रेविषयीची मला कोणतीही माहिती नाही. जिल्ह्यात संघर्ष यात्रा काढल्यास त्यात मी सहभागी होणार आहे.''
आमच्या काळात सिंधुदुर्ग जिल्हा टॅंकरमुक्त होता. सद्यःस्थितीत जिल्ह्यातील अनेक गावांना टॅंकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. याला पांढऱ्या पायाचे सत्ताधारीच जबाबदार असल्याचे त्यांनी सांगितले. अवकाळी पावसामुळे बागायतदारांचे नुकसान झाले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणले असता जिल्ह्यातील एकाही बागायतदाराने याप्रश्नी आपली भेट घेतलेली नाही. खरेच नुकसान झाले असेल तर आपण या संदर्भात आवाज उठवू. कारण स्थानिक आमदारांना या नुकसानीची जाणीवच नसल्याने ते सभागृहात प्रश्न उपस्थित करू शकत नाही; मात्र बागायतदारांच्या समस्येसंदर्भात आपण आवाज उठवून त्यांना न्याय मिळवून देऊ, असे श्री. राणे यांनी स्पष्ट केले.
या वेळी जिल्हाध्यक्ष देवदत्त सामंत, जिल्हा उपाध्यक्ष बाळू कोळंबकर, तालुकाध्यक्ष मंदार केणी, आबा हडकर, महेश जावकर, दीपक पाटकर, सूर्यकांत फणसेकर, भाई मांजरेकर यांच्यासह कॉंग्रेसचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
|