रत्नागिरी - मुसळधार पावसाने अवघी मुंबई मंगळवारी (ता. 29) पुराने वेढली गेली होती. त्याचा फटका कोकण रेल्वेला बसला. अद्यापही रेल्वेचे वेळापत्रक कोलमडलेले असून, गाड्या चार ते सहा तास उशिराने धावत होत्या. गाड्या अचानक रद्द केल्याने गौरी आगमनासाठी कोकणात येऊ घातलेल्या चाकरमान्यांची गैरसोय झाली.
मुंबईत लोहमार्गाला नदीचे रूप आल्यामुळे सर्वच वाहतूक थांबविण्यात आली होती. कोकणातून मुंबईला जाणाऱ्या गाड्या पनवेलपर्यंत थांबविल्या होत्या. मुंबईतील सर्व स्थानकांवर याविषयीची घोषणा केली होती. मात्र पनवेलपर्यंत येण्याचा मार्ग पावसाने रोखल्यामुळे कोकणात येणाऱ्यांची तारांबळ उडाली.
कोकण रेल्वे मार्गावर सुटलेल्या सर्वच गाड्या तीन ते सहा तास उशिराने धावत आहेत. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्यांमध्ये मंगला एक्स्प्रेस तीन तास 21 मिनिटे, दादर पॅसेंजर दोन तास 30 मिनिटे, नेत्रावती एक तास 40 मिनिटे, तर गोव्याकडे जाणाऱ्या दिवा-सावंतवाडी एक तास 28 मिनिटे, मत्स्यगंधा 14 तास 51 मिनिटे, राजधानी एक तास 28 मिनिटे, मंगला एक्स्प्रेस 19 तास 36 मिनिटे, जनशताब्दी सहा तास, तर मांडवी एक्स्प्रेस दोन तास उशिराने धावत होत्या.
|