रत्नागिरी जिल्ह्यात २६ किनारे पर्यटकांसाठी सज्ज

रत्नागिरी जिल्ह्यात २६ किनारे पर्यटकांसाठी सज्ज

रत्नागिरी - समुद्रकिनाऱ्यांवर सुविधा पुरविताना पर्यटकांना आकर्षित करून घेण्यासाठी मेरीटाईम बोर्डाने निर्मल सागर तट अभियानातून गेले काही महिने विशेष मेहनत घेतली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील २६ किनारे पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. सुविधा, सुरक्षा आणि रोजगार या तीन गोष्टींसाठी या किनाऱ्यांवर पावणेदोन कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. उन्हाळी सुटीत येणाऱ्या पर्यटकांना निश्‍चितच किनाऱ्यांवरील बदल भावणार आहेत.

सागरी मंडळामार्फत निर्मल सागर तट अभियान योजना जिल्ह्यातील २६ किनारी भागात राबविली जात आहे. या ग्रामपंचायतींना ३ कोटी ३० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. पहिल्या टप्प्यात चाळीस टक्‍के म्हणजे १ कोटी ३२ लाख रुपये आणि दुसऱ्या टप्प्यात १ कोटी ७७ लाख रुपये वितरित केले. आतापर्यंत विविध कामांसाठी १ कोटी ८९ लाख ३७ हजार २९७ रुपये खर्ची टाकण्यात आले आहेत.

पर्यटनवाढ आणि रोजगारनिर्मितीचे उद्दिष्ट ठेवून गेले काही महिने काम सुरू आहे. त्यात ग्रामपंचायतींचा सहभाग उत्स्फूर्त आहे. जास्तीत जास्त निधी खर्ची टाकण्यात यश आले आहे. जिल्ह्याला पुरस्कारही मिळेल.
- कॅ. संजय उगलमुगले,
प्रादेशिक बंदर अधिकारी

भाट्ये, रनपार, वायंगणी, मिऱ्या, काळबादेवी, वारे, मालगुंड, गणपतीपुळे, नेवेर, नांदिवडे, वेळणेश्‍वर, हेदवी, पालशेत, कोळथरे, आंजर्ले, मुरुड, हर्णे, केळशी, वेळास, गणेशगुळे, पूर्णगड, गावखडी, आंबोळगड, वाडातिवरे, जैतापूर, वाडापेठ, कशेळी या किनाऱ्यांवर मेरीटाईम बोर्डाने विविध सोयीसुविधा दिल्या आहेत. समुद्रकिनारा स्वच्छ आणि निर्मल राहण्याकरिता पर्यटकांशी संवाद साधण्यात आला. त्या उपाययोजना तिथे राबविल्या गेल्या. 

पावसाळ्यात भरतीच्या लाटांमुळे किनाऱ्यांची धूप होते. ती टाळण्यासाठी किनाऱ्यावर झाडे लावणे, वाळूशिल्प उपक्रम राबविण्यात येत आहेत. किनाऱ्यावर पर्यटकांना सावलीसाठी छोट्या छत्र्या, वॉच टॉवर, जीवरक्षक, लाईफ जॅकेट, बोया, प्रथमोपचार किट, सागरी सुरक्षा साहित्य, वाहनतळ, धार्मिक विधीसाठी शेड, कचरा ट्रॉली ठेवण्यात आले आहे. किनाऱ्यावरील सनसेट पॉइंटचा आनंद घेता यावा यासाठी आवश्‍यक शेडही उभारण्याचे काम या माध्यमातून हाती घेण्यात आले आहे.

पर्यटनवाढीसाठी राबविलेल्या उपक्रमात सर्वाधिक  चांगले काम करणाऱ्या ग्रामपंचायतीचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. त्याचे सर्व्हेक्षण एप्रिल महिन्यात केले जाणार आहे. त्यासाठी त्रयस्थ समितीकडून किनाऱ्यांची पाहणी केली जाईल. पर्यटकांचा प्रतिसाद, केलेली कामे, रोजगार निर्मितीसाठी राबविलेल्या उपक्रमांचे फलीत याची तपासणी यामध्ये होईल. उत्कृष्ट ग्रामपंचायतींसाठी जिल्हा आणि राज्यस्तरावर मुल्यांकन होणार आहे. यासाठी रत्नागिरी जिल्हा सज्ज झाला असून प्राप्त निधीचा सदुपयोग करत सव्वीस किनाऱ्यांना आगळीवेगळी झळाळी मिळाली आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com