मंडणगड किल्ल्यावरील जैवविविधता वणव्यामुळे नष्ट

मंडणगड किल्ल्यावरील जैवविविधता वणव्यामुळे नष्ट

मंडणगड - किल्ल्यावरील शिवकालीन इतिहासाची साक्ष देणाऱ्या खुणा दुर्लक्षित आहेत. स्थानिकांसह पर्यटकांनाही पर्वणी ठरणारे गडावरील पुरातन अवशेष, बुरुज, तटबंदी, जुने वाडे, निसर्गरम्य स्थळे  भकास  आहेत. दरवर्षी न चुकता किल्ल्यामध्ये लागणाऱ्या वणव्यामुळे येथील जैवविविधता, वनसंपदा नष्ट होऊन सर्रास नजरेस पडणारे पक्षी, जंगली प्राणी दिसेनासे झाले आहेत. याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले असून, त्यामुळे किल्ल्याचे अस्तित्वच धोक्‍यात आले आहे. किल्ला वनविभागाने ताब्यात घेतला आहे. पर्यटकांसह स्थानिकही मंडणगड किल्ल्यास भेट देतात.

किल्ल्यावरून दिसणारे सभोवतालचे नयनरम्य दृश्‍य, झोंबणारा गार वारा आणि हिरवागार निसर्ग नजरेत साठवतात. किल्ल्यावर जाण्याकरिता काही वर्षांपूर्वी डांबरी रस्ता बनवून गाडी मार्ग तयार केला. त्यामुळे वयोवृद्ध नागरिक, पर्यटकांना किल्ल्यावर जाणे सोपे झाले. अनेकांचा मंडणगड किल्ला विकेंड पर्यटनस्थळ झाले आहे. पावसाळ्यात किल्ल्‌ा हिरवाईचा शालू परिधान करतो. त्यावेळी पर्यटक आवर्जून भेट देतात.

किल्ला वनविभागाच्या ताब्यात असून, त्यांच्याशी संपर्क केला असता निधीची तरतूद झाली नसल्याचे सांगण्यात आले. नगरपंचातमार्फत किल्ल्याकडे गांधीचौकमार्गे जाणारा रस्ता रुंद आणि डांबरीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे किल्ल्यावर जाण्याचा दळणवळणाचा मार्ग सुकर होईल.
- राहुल कोकाटे,
उपनगराध्यक्ष

नुकताच शासनाने तालुक्‍यातील बाणकोट किल्ल्याला नवा साज चढवणार असल्याचे जाहीर केले. मात्र मंडणगड किल्याकडे शासन, प्रशासन व पुरातत्व विभागाने पुर्णपणे दुर्लक्ष केल्याने किल्याच्या माध्यमातून पर्यटन विकासाची गाडी केवळ चर्चेच्या गु-हाळात अडकली आहे. 

किल्ल्यावरील वैभव संरक्षित करून पर्यटकांपर्यंत पोचणे गरजेचे असून, त्यासाठी विशेष मोहीम राबवावी लागेल.
- हरेशभाई मर्चंडे, 

संस्थापक मेत्ता फाऊंडेशन

पुरेशा सोयीसुविधांअभावी पर्यटकांचा ओघ सुरु झालेला नाही. किल्ल्यावर वस्ती करणे ही खरेतर एक साहसी अनुभव आहे. किल्यावर दोन तळी, एक मंदिर, ढासळती तटबंदी व एक तोफ आहे. प्रेमीयुगलांचा वावर, मद्यपींचा धुमाकूळही येथे सुरू असते. त्यामुळे सुरक्षा रक्षक नेमण्याची मागणी होत आहे.

कोकणातील अन्य किल्यांप्रमाणेच मंडणगड किल्ला ही राज्यशासनाने पुरातत्व विभागाचे ताब्यात देऊन संरक्षित करणे गरेजेचे आहे. केवळ ऐतिहासिक वारसा पुरेसा नसून पर्यटकांनी किल्यास वारंवार येण्यास प्रवृत्त करणारे उपक्रम राबविणे गरजेचे आहे यात संग्रहालय, उद्यान, तळ्यात बोटिंगसारख्या उपक्रमांचा समावेश होऊ शकतो.


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com