कर्णबधिरतेच्या दोषांवर मात शक्‍य - गीतांजली पालकर

रत्नागिरी ः के. प. अभ्यंकर मूकबधिर विद्यालयात पालकांना मार्गदर्शन करताना गीतांजली पालकर.
रत्नागिरी ः के. प. अभ्यंकर मूकबधिर विद्यालयात पालकांना मार्गदर्शन करताना गीतांजली पालकर.

रत्नागिरी - कर्णबधिर मुलांमध्ये श्रवणदोषाची तीव्रता वय वर्षे ० ते ५ मध्ये किती आहे, याचे लवकर निदान होणे आवश्‍यक आहे. त्यानंतर तत्काळ श्रवणयंत्र मिळणे गरजेचे आहे. मुलाची बौद्धिक क्षमता जाणून चंचलता, स्वमग्नता या दोषांवरही मात करता येते. बाराखडी, उच्चार कसा करायचा, एकत्र गाणी, चुकलेल्या शब्दांचे उच्चार मॉडेल, मुलांवर व स्वतःवर विश्‍वास अशा अनेक उपायांमधून पालक मुलाला बोलायला शिकवू शकतात. तेच मुलाला अधिक चांगले जाणतात. त्यामुळे मुलाचा विकास होण्यात पालकांची भूमिका मोठी असते, अशी माहिती ऑडिओलॉजिस्ट व स्पीचथेरपीस्ट सौ. गीतांजली पालकर यांनी दिली.

येथील के. प. अभ्यंकर मूकबधिर विद्यालयात पालक मार्गदर्शनासाठी त्या आल्या होत्या. त्यांनी सांगितले की, मूकबधिर मुलांच्या पालकांपुढे मूल बोलेल का, इतरांप्रमाणे शिकेल का, नोकरी व्यवसाय करेल का, समाजात आदर मिळेल का, असे अनेक प्रश्‍न असतात. मुलांच्या उपचारासाठी कान, नाक, घसातज्ज्ञ, श्रवण, वाचातज्ज्ञ, विशेष शिक्षिका, भाषा थेरपिस्ट, फिजिओथेरपिस्ट, ऑक्‍युपेशनल थेरपिस्ट उपलब्ध असतात. मूल अनेक कारणांमुळे श्रवणयंत्र लावत नाहीत.

त्यामुळे श्रवणयंत्र घेताना ऑडिओग्रामनुसार घेणे योग्य. तसेच डिजिटल तंत्रज्ञान, गोंगाट कमी ऐकू येणे, बोलणे अधिक स्पष्ट व सुखकर, आकाराने लहान, वजनाने कमी व वायरलेस तंत्रज्ञान अशी वैशिष्ट्ये असणारे श्रवणयंत्र घेण्याचा सल्ला त्यांनी दिला.
मूल घरी मशीन लावत नाही, खूप मस्ती करते, आमच्याबरोबर बसत नाही, काय शिकवायचे समजत नाही, वेळच मिळत नाही यावरचे उपाय व घरी भाषावाढ कशी करावी, आवाजातील चढउतार, मृदूता याविषयी पालकर यांनी मार्गदर्शन केले.

कर्णबधिर विद्यार्थ्यांना सामान्य शाळेत पाठवण्याचा सल्ला अनेक लोक देतात. पण यातून पालकांचाच गोंधळ उडतो. या विद्यार्थ्यांनी विशेष शाळेत जाणेच श्रेयस्कर. ऑडिओथेरपिस्टकडून लवकर निदान करून घेतल्यानंतर विशेष शाळेत प्रवेश घ्यावा. सामान्य शाळेत पाठवायचा तर पालकांची भरपूर तयारी हवी. विशेष शाळेत प्रवेश घेतल्यास निश्‍चित विचारांची दिशा पालकांना व विद्यार्थ्यांना कळते, असा दावा त्यांनी केला. 

कर्णबधिरांच्या भाषा व वाचामधील सुधारणा, विकासासाठी नेमकेपणाने पायऱ्या समजल्या. दृकश्राव्य व्याख्यानामुळे ते परिणामकारक झाले. यंत्र कोणते लावावे, ऑडिओलॉजी कुठे करावी, याची माहिती मिळाली. यंत्रावर खर्च केला तर भाषा विकासासाठी अधिक परिणामकारक ठरते. आमचा आत्मविश्‍वास वाढला आहे.
- सौ. उषा सुर्वे
, पालक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com