श्री देव मार्लेश्‍वरचा विवाह सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

श्री देव मार्लेश्‍वरचा विवाह सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

देवरूख -  शिवभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री देव मार्लेश्‍वरचा विवाह आज दुपारी सनई चौघड्यांच्या सुरात आणि मंगलाष्टका मंत्रोपचारांच्या मंगलमय वातावरणात कोंडगावची श्री देवी गिरिजा हिच्याबरोबर थाटात संपन्न झाला. या सोहळ्यासाठी असंख्य भाविकांनी सह्याद्रीच्या कपारीत कालपासून गर्दी केली होती. 

आंगवली येथील मुळ मठात विवाहापुर्वीचे सर्व विधी झाल्यावर काल रात्री श्री देव मार्लेश्‍वरची मुर्ती; चांदीचा टोप प्रथेप्रमाणे सजविलेल्या पालखीत ठेवण्यात आला. याचबरोबर गंगामाता आणि मल्लीकार्जुनाची मुर्तीही पालखीत स्थानापन्न झाली. त्यानंतर आंबवची दिंडी, वांझोळेची कावड, देवरुखची दिंडी, विवाहसोहळ्याचे यजमानी वाडेश्‍वर देवाची पालखी आदींचे मानकरी व भाविकांसह आंगवली मठात आगमन झाले. काल मध्यरात्री 12 वाजता हर हर मार्लेश्‍वरचा जयघोष करीत हा सारा लवाजमा मार्लेश्‍वर शिखराकडे निघाला. ढोल, ताशे, गुलालाची उधळण करीत फटाक्यांच्या आतषबाजीत श्री देव मार्लेश्‍वरची पालखी मार्गस्थ झाली. पालखी वाहण्याचा मान प्रथेप्रमाणे भोई समाजाचा होता तर सोबत मशालजी म्हणून चर्मकार बंधू, मारळचे सुतार, अबदागिर, कासारकोळवणचे ताशेवाले, चौरी, न्हावी बंधू याचप्रमाणे मानकरी आंगवलीचे अणेराव बंधू आदींसह हजारो भाविक यामध्ये सहभागी झाले होते.

शिखराच्या पायथ्याजवळ असलेल्या पवईच्या पायरीवर हा सारा लवाजमा आणि साखरप्याहून आलेल्या वधू गिरीजादेवीची पालखी उत्तररात्रीनंतर एकत्र आल्यावर हर हर महादेवाच्या जयघोषाने सारा सह्याद्री दुमदुमून गेला. शिखरावर पोचल्यावर तीनही पालख्यांचे प्रथेप्रमाणे पारंपरिक स्वागत करण्यात आले. त्यानंतर तीनही पालख्या नियोजित ठिकाणी वस्तीला गेल्या. सोबत मानकरीही होतेच. पहाटे मुलीचे घर पाहणे, मागणी टाकणे, मुलाचे घर पाहणे, पसंती, ठरावनामा, कल्याणविधीची वेळ ठरवणे असे विधी झाले.

दुपारी विवाहासाठी 360 मानकर्‍यांना रीतसर निमंत्रण देण्यात आले. त्यानंतर मुहुर्तावर श्री देव मार्लेश्‍वर आणि गिरीजादेवीचे लग्न लावण्यात आले. यासाठी आधीच हिंदू धर्मातील लिंगायत धर्मीय शास्त्रानुसार पंचकलशाची मांडणी करण्यात आली होती. यावेळी करवलीचा मान प्रथेप्रमाणे गोठणे गावाकडे होता.

मंगलाष्टका आणि मंत्रोच्चारांच्या मंगल वातावरणात हा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. तदैंव लग्नम... चे सुर मंडपात उमटले आणि सर्व भाविकांनी परमेश्‍वराचे लग्न लावण्याचा अपूर्व योग साधला. 

विवाहानंतर उपस्थित भाविकांनी देवाला जानवी अर्पण केली त्याचप्रमाणे नवीन प्रथेप्रमाणे नवरा, नवरीला आहेर देण्यात आला. यावेळी सौभाग्यवतींनी करंबेळीच्या डोहात फुले, पानाचा विडा, सुपारी, बांगड्या, हळद, पिंजर असे सामान असलेली परडी अर्पण केली. त्यानंतर नवविवाहितांच्या मुर्त्या सर्व विधी झाल्यावर मार्लेश्‍वराच्या गुहेत ठेवण्यात आल्या. 

आज यात्रोत्सवाचा मुख्य दिवस असल्याने होणारी गर्दी लक्षात घेऊन संपूर्ण मारळ परिसरासह मार्लेश्‍वर पायथा ते शिखर, धारेश्‍वर धबधबा आणि करंबेळीचा डोह आदी भागात कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. देवरूखचे पोलिस निरीक्षक शिवाजी पाटील हे कालपासूनच यात्रास्थळी विशेष लक्ष ठेवून होते. राज्य परिवहन महामंडळाने पार्किंगपासून थेट पायथ्यापर्यंत जाणारी विशेष बससेवाही सुरू केली होती. याचप्रमाणे देवरूख, संगमेश्‍वर, साखरपा, माखजन, चिपळूण, गुहागर, रत्नागिरी, राजापूर, दापोली अशा आगारातून महामंडळाच्या जादा फेर्‍याही सोडण्यात आल्या. यात्रोत्सवाच्या ठिकाणी अनेक स्वयंसेवी संस्थांनी खिचडी प्रसाद, मोफत सरबत, पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा असे उपक्रम राबविले. आज संपूण दिवस तीनही पालख्यांचे वास्तव्य मार्लेश्‍वर शिखरावर राहणार असून उद्या सर्व पालख्या व मानकरी पायथ्याकडे येण्यास निघणार आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com