'घटना बदलू इच्छिणाऱ्यांना रोखा'

'घटना बदलू इच्छिणाऱ्यांना रोखा'

सावंतवाडी - ‘भारतीय राज्यघटना जगात सर्वोत्तम आहे. ती बदलू इच्छिणाऱ्यांना रोखले पाहिजे,’ असे मत बेळगावच्या जी. एस. एस. कॉलेजचे प्राचार्य आनंद मेणसे यांनी आज येथे व्यक्त केले.

सावंतवाडी संस्थानचे भूतपूर्व अधिपती पुण्यश्‍लोक बापूसाहेब महाराज यांची ८० वी पुण्यतिथी श्री पंचम खेमराज महाविद्यालयात करण्यात आली. अध्यक्षस्थानी जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष राजेसाहेब खेमसावंत भोसले, प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य मेणसे, राजघराण्याचे राजगुरू राजेंद्र भारती महाराज, संस्थेचे चेअरमन श्रीमंत शुभदादेवी भोसले, विश्‍वस्त श्रीमंत लखमराजे भोसले (युवराज), सत्कारमूर्ती डॉ. बॉस्को हेनरीक, शिल्पकार कुणाल जोशी व बासरीवादक धवल जोशी, काँग्रेस तालुका अध्यक्ष संजू परब, नगरसेवक राजू बेग, संस्था पदाधिकारी, संस्थेचे संचालक डॉ. सतीश सावंत, ॲड. शामराव सावंत, प्रा. डी. टी. देसाई, जयप्रकाश सावंत, काका मांजरेकर, सुरेश भोसले, शिवाजी सावंत, नाना नाईक, सुरेश गवस, सदासेन सावंत, एन. आर. सावंत, नकुल पार्सेकर, अन्वर खान, प्रेमानंद देसाई, प्रकाश परब, विकास नाईक, भगवान देसाई, यशवंत देसाई, सुशील मोडक, श्री. रॉड्रीक्‍स, श्री. राऊळ, प्राचार्य डी. एल. भारमल उपस्थित होते.

प्राचार्य डॉ. भारमल यांनी प्रास्ताविक केले. या प्रसंगी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये बायोडाय प्रा. लिमिटेड ही कंपनी माडखोल येथे स्थापन करून रोजगार देणारे तसेच स्त्रियांना या प्रकल्पात सामावून घेऊन जंगली झाडांच्या पानांपासून नैसर्गिक रंगनिर्मिती करीत असलेले डॉ. बॉस्को हेनरीक यांचा राजेसाहेब श्रीमंत शिवरामराजे भोसले यांच्या हस्ते सत्कार झाला. शिल्पकार कुणाल जोशी व बासरी वादक धवल जोशी या बंधूचा सत्कार झाला. कार्यक्रमानिमित्त बारावीमधील गुणवंतांनाही गौरविण्यात आले. कार्यक्रमात खेमराजीय या वार्षिक अंकाचे प्रकाशन करण्यात आले. 

प्राचार्य मेणसे यांनी भारताची राज्यघटना या विषयावर मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ‘‘भारतीय राज्यघटना जगात सर्वोत्कृष्ट अशी आहे. ती धर्म निरपेक्ष आहे. सामाजिक न्यायावर आधारीत आहे. स्वातंत्र्यापूर्वीचा कायदा हा मनू स्मृतीवर आधारीत होता. स्वातंत्र्यानंतर भारताची राज्यघटना लिहिली गेली. यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सिंहाचा वाटा होता.’’

राजेसाहेब खेमसावंत भोसले यांनी अध्यक्षस्थानावरून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांनी कॉलेजचा परिसर स्वच्छ ठेवा. त्याचा पुरेपूर लाभ उठवा तसेच कष्ट करा. महाविद्यालयाचे नाव उज्वल करा व आपले करिअर चांगले करा असा सल्ला दिला. संस्थेचे सहसंचालक प्रा. डी. टी. देसाई यांनी आभार मानले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन करून जी सर्वांना सामावून घेईल. सर्वांना समान संधी देईल, अशी राज्यघटना तयार केली. या घटनेने सर्वांना मदतानाचा अधिकार दिला. स्त्रियांना अधिकार प्राप्त झाला, स्त्रियांचा सन्मान झाला, भारताने समाजवादी, लोकशाहीवादी धर्मनिरपेक्षवासी, विज्ञानदादी राज्य घटना स्विकारली. राज्यघटना लोकांना अर्पण केली. या राज्य घटनेचा आदर प्रत्येकाने केला पाहिजे. ती बदलू पाहणाऱ्यांना आपण रोखले पाहिजे.
- आनंद मेणसे, प्राचार्य, जी. एस. एस. कॉलेज, बेळगाव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com