आंबोली घाट चौपदरीकरणासाठी हालचाली

आंबोली घाट चौपदरीकरणासाठी हालचाली

आंबोली - आंबोली घाटाच्या चौपदरीकरणासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. भारतमाला योजनेतून हे काम घेतले जाणार असून केंद्रस्तरावर याच्या मंजुरीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. या पार्श्‍वभूमीवर घाटाच्या सर्व्हेचे काम सुरू आहे.

केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर महाराष्ट्रात पायाभूत सुविधा विकासाला अधिक प्राधान्य दिले. राज्यातील २७ हजार किलोमीटर रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम हाती घेतले. त्यात राज्यमार्गांचे चौपदरीकरणाचे कामही हाती घेतले आहे. वाहतुकीसाठी जलमार्ग, हवाईमार्ग, रस्तेमार्ग यांना एकत्र जोडण्याचे काम हाती घेतले. यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद केली. याला टप्प्याटप्प्याने अंतिम मंजुरीही मिळत आहे.

कोकण विभागात केंद्राने २१९४.३६ किलोमीटर लांबीचे ३९ हजार ५०० कोटी एवढ्या किंमतीचे कामे हाती घेतली आहेत. यात मुंबई, गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ च्या बाजूला ३६६.१७ किलोमीटर रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी यातील १२ हजार ५८ कोटी इतका निधी सागरी महामार्गाच्या ५७० किलोमीटरसाठी १० हजार कोटी इतका निधी मंजूर केला आहे. या शिवाय वेंगुर्ले-सावंतवाडी-बुर्डीपूल-आंबोली-बेळगाव जोडणारा नवा ६० किलोमीटरचा राष्ट्रीय महामार्ग होणार आहे. यासाठी ६०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. 

रेडी, बंदर आरोंदा, सावंतवाडी, बुर्डीपूल, आंबोली, आजरा कोल्हापूरला जोडणाऱ्या मार्गापैकी ४० किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी ४०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. आंबोलीतून जाणाऱ्या रस्त्यांसाठी एकूण १ हजार कोटींची तरतूद असून हे मार्ग बुर्डीपुलापासून आंबोलीपर्यंत कॉमन असणार आहेत. यामुळे वेंगुर्ले आणि रेडी ही दोन्ही बंदरे बेळगाव व कोल्हापूरला जोडली जातील.या पार्श्‍वभूमीवर आंबोली घाटाचे रुंदीकरण करावे लागणार आहे. याच्या चौपदरीकरणाच्यादृष्टीने हालचाली सुरु आहेत.

मंजुरीसाठीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून घाटाच्या स्ट्रक्‍चर सर्व्हेचे काम हाती घेण्यात आले आहे. मुंबईतील शिवप्रभू कन्स्ट्रक्‍शन कंपनीतर्फे हे काम सुरु असून लवकरात लवकर ते पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.याआधी बेळगाव रस्त्याचे सर्वेक्षण झाले; मात्र आजरा रस्त्याच्या सर्वेक्षणासाठी केवळ एकच निविदा आल्याने पुन्हा निविदा मागविण्यात आली होती. यातच घाटाचे सर्वेक्षण घेण्यात आल्याचे समजते. घाटरस्त्याच्या चौपदरीकरणाची तरतूद असून त्यासाठी निधीही लवकरच उपलब्ध होईल अशी माहिती सूत्रांनी दिली. चौपदरीकरण झाल्यास या मार्गावरुन प्रतिदिन दहा हजार इतक्‍या गाड्या धावू  शकतील.

रिंगरोड भारतमालामधून होणार...
रेडीतून येणारा नवा राष्ट्रीय मार्ग सावंतवाडी शहरातून जाणार आहे. हा मार्ग आता अस्तित्वात असलेल्या रस्त्यालाच जोडला जाईल; मात्र सावंतवाडीतील रिंगरोड अनेकवर्षे प्रलंबित आहे. भारतमाला प्रकल्पातून हा रिंगरोड पूर्ण करण्यासाठीचा आराखडा बनविण्यात आला आहे. तो केंद्राला पाठविला गेला असून त्याला मंजुरी मिळाल्यास रिंगरोड लवकरच मार्गी लागण्याची शक्‍यता आहे. राष्ट्रीय महामार्गाची जोड असल्याने भारतमालातून हा प्रकल्प मंजूर होईल अशी शक्‍यता वरिष्ठ सूत्रांनी वर्तविली.

अन्य मार्ग दुपदरी...
सध्या चौपदरीकरणासाठी हालचाली असल्यातरी पहिल्या टप्प्यात आंबोली घाट वगळता इतर मार्ग दुपदरीच राहण्याची शक्‍यता आहे. घाट प्रशस्त करून इतर मार्गावर दुपदरी रस्ता ठेवला जाऊ शकतो. जमीन संपादन मात्र एकाचवेळी चौपपदरी किंवा सहापदरी रस्त्याच्या दृष्टीने केले जाण्याचीही शक्‍यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com