नीतेश राणेंचा स्वाभिमान गेला कुठे? - अतुल रावराणे

नीतेश राणेंचा स्वाभिमान गेला कुठे? - अतुल रावराणे

वैभववाडी - काँग्रेस नेते नारायण राणेंनी काँग्रेसला रामराम केल्यानंतर त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. ते खऱ्या अर्थाने स्वाभिमानी नेते आहेत. परंतु त्यांना देव मानणारे आमदार नीतेश राणेंनी यातून पळ काढला. त्यांचा स्वाभिमान आता गेला कुठे, असा सवाल भाजप नेते अतुल रावराणे यांनी केला.

भाजप कार्यालयात पत्रकार परिषद झाली. सभापती लक्ष्मण रावराणे, जिल्हा परिषद सदस्य सुधीर नकाशे, बंडू मुंडल्ये, किशोर दळवी आदी उपस्थित होते. 

रावराणे म्हणाले, ‘‘कोकणचे नेते नारायण राणे यांनी ज्या वेळी शिवसेना सोडली त्यावेळी त्यांच्यासोबत तत्कालीन आमदार गणपत कदम, सुभाष बने, शंकर कांबळी यांच्यासह अनेकांनी राणेंवर विश्‍वास ठेवून आपल्या पदाचा त्याग केला; परंतु आजची परिस्थिती विचित्र आहे. राणेंसोबत जिल्ह्यातील सर्व समर्थकांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मात्र, आमदार नीतेश राणेंनी राजीनामा दिला नाही. राजीनामा दिला तर पोटनिवडणूक लागेल. या भीतीने त्यांनी पळ काढला आहे. आमदार राणे हे अनेक वर्षे स्वाभिमान संघटना चालवित आहेत; परंतु आता त्यांचा स्वाभिमान गेला कुठे?’’

ते म्हणाले, ‘‘ज्यांच्यामुळे आमदार झालात ते पद सोडायला भीती कसली वाटते. आमदार राणे यांनी तीन वर्षांत काहीही काम केले नाही. त्यामुळे निवडणुकीला सामोरे जायचे धाडस ते करीत नाहीत. आपण आमदार होण्यापूर्वी आपल्या मतदारसंघातील देवगड आणि वैभववाडी पंचायत समिती काँग्रेसच्या ताब्यात होती. या निवडणुकीत त्या दोन्ही पंचायत समिती गमावल्या आहात. माझ्या राजकीय ताकदीचा मला अंदाज आहे; पण माझ्या गावचा सभापती बसविला हे तुम्हाला माहीत नाही का?’’

ते म्हणाले, ‘‘प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना तुच्छ लेखणे, कुणालाही मान न देणे ही नीतेश राणेंची प्रवृत्ती नारायण राणेंच्या आजच्या राजकीय स्थितीला कारणीभूत आहे. मी हवेत, धुंदीत असतो अशी टीका त्यांनी माझ्यावर केली होती; परंतु तुमची धुंदी आम्ही पंचायत समिती निवडणुकीत उतरविली. तीन पैकी दोन जिल्हा परिषद आणि सहापैकी तीन पंचायत समिती सदस्य आमचे आहेत. खरे तर आम्हाला राजकीय वारसा नाही. तुम्ही आमदार आहात ती नारायण राणेंची पुण्याई आहे. त्यामध्ये तुमच कर्तृत्व काहीच नाही.’’

ते म्हणाले,‘‘शरद पवार हे देशाचे नेते आहेत. त्यांना मीच नाही तर देशातील सर्वच पक्षाचे नेते आदराचे स्थान देतात. त्यांना असल्या किरकोळ विषयात आणण्याचे काम राणे करीत आहेत. राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांच्याशी माझे मंत्री होण्यापुर्वीपासुनचे ऋणानुबंध आहेत. परंतु त्यांना मी कधी देव मानत नाही. ते चांगले मित्र आहेत. आम्ही ज्या पक्षात काम करतो त्याच पक्षाची ध्येय धोरणे डोळ्यासमोर ठेवुन काम करतो.’’
बंडु मुंडल्ये म्हणाले,‘‘गाडीवर झाड पडल्यामुळे झाडांच्या फांद्या तोडल्या असे आमदार श्री. राणेंकडून सांगीतले जात आहे. परंतु शहरातील दोन वडाची झाडे तोडण्यात आली आहेत. उर्वरित झाडे कुणाच्या अंगावर, गाडीवर पडणार नाहीत हे त्यांना समजले का? जर सेल्फी काढताना कुणी झाडावरून कोसळला तर त्याची जबाबदारी श्री. राणे घेणार का?’’

धमक्‍यांना भीक घालत नाही
आपण जिल्ह्याच्या राजकारणात आलो ते समाजकारणासाठी; परंतु ते करीत असताना कुणी आपल्याला धमक्‍या देण्याचा प्रयत्न करीत असेल तर आपण त्यांना जशास तसे उत्तर देऊ. आपण कुणाच्या धमक्‍यांना भीक घालीत नाही, असे 
श्री. रावराणे यांनी या वेळी स्पष्ट केले.

पक्ष देईल त्याचाच प्रचार
पोटनिवडणुकीत नीतेश राणे भाजपचे उमेदवार असले तर तुम्ही त्यांचे काम करणार का, असा प्रश्‍न श्री. रावराणे यांना विचारला असता ते म्हणाले, ‘‘मी त्यांचे काम अजिबात करणार नाही. माझी बांधीलकी पक्षाशी आहे. पक्ष जो कुणी उमेदवार देईल, त्याचे काम आम्ही प्रामाणिकपणे करणार.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com