शिवसेनेकडून सिंधुदुर्ग किल्ल्यावर स्वच्छता

शिवसेनेकडून सिंधुदुर्ग किल्ल्यावर स्वच्छता

मालवण - येथील ऐतिहासिक सिंधुदुर्गावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त तालुका शिवसेनेच्या वतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत आमदार वैभव नाईक यांच्यासह नगराध्यक्ष, तालुक्‍यातील शिवसेना पदाधिकारी, महिला सहभागी झाल्या होत्या.

दरम्यान, किल्ल्यास भेट देणाऱ्या पर्यटकांकडून किल्ल्यात वायरी भुतनाथ ग्रामपंचायतीच्या वतीने कर आकारणी केली जाते; मात्र, त्याबदल्यात आवश्‍यक सुविधा दिल्या जात नसल्याबाबत आमदार वैभव नाईक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ग्रामपंचायतीने मिळणाऱ्या कराच्या बदल्यात काही प्रमाणात किल्ल्यात स्वच्छता तसेच अन्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त तालुका शिवसेनेच्या वतीने आज सकाळपासून सिंधुदुर्ग किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबविली. यावर्षी पाऊस उशिरापर्यंत राहिल्याने किल्ल्यात मोठ्या प्रमाणात झाडी वाढली होती. त्यामुळे आज राबविलेल्या मोहिमेत तटबंदीवरील झाडी, शिवराजेश्‍वर मंदिराकडे जाणाऱ्या मार्गाच्या दुतर्फा असलेली झाडी तसेच अन्य भागातील झाडी पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच अन्य कामगारांनी हटवित त्याची विल्हेवाट लावली.

सकाळच्या सत्रात उपतालुकाप्रमुख हरी खोबरेकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, नगरसेवक पंकज सादये, शहरप्रमुख गणेश कुडाळकर, महिला नगरसेविका, शिवसेनेचे अन्य पदाधिकारी तसेच वायरी भुतनाथ ग्रामपंचायत सरपंच ललित वराडकर, भाई ढोके यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. 

दुपारच्या सत्रात आमदार वैभव नाईक यांनी किल्ला स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. सुरवातीस किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळच्या परिसरात कमी प्रमाणात स्वच्छता झाली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या भागात झाडी काही प्रमाणात हटवून त्याची विल्हेवाट लावली. तटबंदीवर वाढलेली झाडी हटविली. पुरातत्त्व विभागाकडून किल्ल्यात दरवर्षी साफसफाई होणे आवश्‍यक असल्याचे आमदार नाईक यांनी स्पष्ट केले. यावर किल्लेदार हरीश गुजराथी यांनी दरवर्षी पुरातत्त्व विभागाच्या वतीने किल्ल्यात साफसफाई केली जाते. मात्र, यावर्षी अद्याप कामगार न आल्याने ही साफसफाई झाली नाही असे स्पष्ट केले. किल्ल्याचा परिसर पाहता एक दिवसाची स्वच्छता मोहिम राबवून परिसर स्वच्छ होणे शक्‍य नसल्याने येत्या आठ दिवसात पुन्हा स्वच्छता मोहिम राबविली जाईल असे आमदारांनी स्पष्ट केले.

ग्रामपंचायतीने स्वच्छता राखावी....
किल्ल्यात जानेवारी महिन्यापासून वायरी भुतनाथ ग्रामपंचायतीच्या वतीने पर्यटकांकडून कर आकारणी केली जात आहे. या कराच्या माध्यमातून किल्ल्यात फिरती शौचालये बसविण्यात आली. मात्र, त्यांना पाणीपुरवठा होत नसल्याने पर्यटकांची गैरसोय होत असल्याचे आमदारांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. पर्यटकांकडून कर आकारणी करत असेल आणि सुविधा उपलब्ध करून देत नसेल तर कर आकारणी बंद करावी लागेल. त्यामुळे ग्रामपंचायतीने किल्ल्यात स्वच्छता राखण्यासाठीही आवश्‍यक उपाययोजना कराव्यात, अशा सूचना आमदार नाईक यांनी या वेळी दिल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com