गेळे सरपंचांसह सदस्यांचा भाजपत प्रवेश

गेळे सरपंचांसह सदस्यांचा भाजपत प्रवेश

सावंतवाडी -  महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून दावा करण्यात आलेल्या गेळे ग्रामपंचायतीच्या सरपंचासह अन्य सदस्यांनी भाजपात प्रवेश केला. त्यामुळे आपली ग्रामपंचायत म्हणून दावा करणाऱ्या स्वाभिमानी पक्षाच्या तालुकाध्यक्ष संजू परब यांना हा धक्का मानला जात आहे.

गेली अनेक वर्षे रखडलेला कबुलायतदार गावकर प्रश्‍नासह गावांचा विकास करण्यासाठी आपण हा निर्णय घेतल्याचे सरपंच अंकुश कदम यांनी जाहीर केले; मात्र १९९९ पासून ग्रामस्थांनी काँग्रेस आणि शिवसेनेकडून फक्त आश्‍वासन देऊन फसवणूक केली, असा आरोपसुद्धा या वेळी त्यांनी केला. 

नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत गेळे ग्रामस्थांच्या एका गटाने गाव विकास आघाडीच्या नावावर ग्रामपंचायत निवडणूक लढविली होती; मात्र त्या ठिकाणी निवडून आल्यानंतर ती आमचीच ग्रामपंचायत आहे असा दावा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे तालुकाध्यक्ष श्री. परब यांनी केला होता.
ही ग्रामपंचायत आम्ही ताब्यात घेऊ, असा दावा भाजपचे तालुकाध्यक्ष महेश सारंग यांनी केला होता. आज अचानक नवनिर्वाचित सरपंच कदम यांच्यासह विद्यमान सरपंच प्रज्ञा गवस, उपसरपंच सतीश गवस, नवनिर्वाचित सदस्य श्रीधर गवस, सुप्रिया बंड, वैष्णवी दळवी, प्रतिभा कदम यांनी भाजपात 
प्रवेश केला.

पक्षात प्रवेश करणाऱ्या या सर्व सदस्यांचे माजी आमदार राजन तेली यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. या वेळी तालुकाध्यक्ष सारंग, जिल्हा उपाध्यक्ष मनोज नाईक, उपनगराध्यक्ष अन्नपुर्णा कोरगावकर, आनंद नेवगी, चंद्रकांत जाधव, शाम काणेकर, राजू गावडे आदी उपस्थित होते.

श्री. गावडे म्हणाले, ‘‘तालुक्‍यातील ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या ग्रामपंचायती या मुळात काँग्रेस म्हणून आल्या होत्या; मात्र त्याच्यावर स्वाभिमान पक्षाचा बिल्ला लावण्याचे काम काही मंडळीनी केले. आता काँग्रेसमध्ये कोणीच वाली राहिलेला नाही. त्यामुळे गावच्या विकासासाठी संबंधित ग्रामपंचायती लवकरच भाजपात प्रवेश करणार आहेत ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे फक्त एसीमध्ये बसून पत्रकार परिषद घेणाऱ्यांनी आता खोटी माहिती देवून हुरळून जावू नये.’’

काँग्रेस, शिवसेनेने फसवणूक केली...
सरपंच सौ. कदम म्हणाल्या, ‘‘आमच्या गावाला कबुलायतदार गावकर या प्रश्‍नाचा शाप लागला आहे. त्यामुळे १९९९ पासून गावाचा विकास झालेला नाही. हा प्रश्‍न सुटावा यासाठी ग्रामस्थांनी अनेक प्रयत्न केले. काँग्रेस आणि शिवसेनेने आश्‍वासन देऊन आमची फसवणूक केली; मात्र भाजपचे तालुकाध्यक्ष सारंग आणि राजू गावडे यांनी मुख्यमंत्री तसेच अन्य लोकांशी चर्चा करून हा प्रश्‍न सोडविण्याचे आश्‍वासन दिले आहे. त्यांच्यावर आमचा विश्‍वास आहे. हा प्रश्‍न सुटण्याबरोबर गावचा सर्वांगीण विकास व्हावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही सर्व सदस्यांनी भाजपात प्रवेश केला आहे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com