हापूस मार्चअखेरीस बाजारात...

हापूस मार्चअखेरीस बाजारात...

सावंतवाडी - जिल्ह्यातील आंब्याची ८५ टक्के फळधारणा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. गेल्यावर्षीप्रमाणे मोहोरधारणेची सर्वसाधारण स्थिती असली तरी वातावरणातील सततच्या बदलामुळे हापूसबाबतची अनिश्‍चितता कायम आहे. कृषी तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार मार्चअखेरीस आंबा उपलब्ध होण्याचे संकेत आहेत. बाजारातही मोठी आवक वाढणार आहे.

आधीच अनेक समस्यांतून तारलेला हापूस यंदा चांगल्या प्रकारे मोहोर धरण्याच्या प्रक्रियेत पास झाला आहे. उशिरापर्यंतचा पाऊस व थंडीमुळे तब्बल एक ते दीड महिना हापुुस लांबणीवर पडला. त्यातच ओखीमुळे नुकसानीसही सामोरे जावे लागले. ओखीचा तडाखा देवगड व वेंगुर्ले किनाऱ्यावरील हापूसवर दिसून आला. तर गेल्या आठवड्यात अरबी समुद्रात कमी दाबाच्या पट्यामुळे मळभी व ढगाळ वातारणामुळे हंगामाच्या दराची अनिश्‍चितता आणखीही गडद केली. जिल्ह्यात काही ठिकाणच्या हापूसवर दरम्यान चार दिवस ढगाळ वातावरणाचे सावट दिसून येते याकाळात हापूसवर करपा आणि भूरी रोगाच्या प्रादुर्भावाचा काहीसा परीणाम होणार असल्याचे सांगण्यात आले होते. तसा परिणाम किरकोळ प्रमाणात जाणवला. देवगड मध्ये काही ठिकाणी फळगळही जाणवत आहे. तर वेंगुर्लेत स्थिती सर्वसाधारण स्थिती आहे. असा ढगाळ वातावरणाचा कालावधीही अल्पकाळ जाणवल्यामुळे हापूस तारला गेला. त्यातच काजुवरही ढेकण्या किडीचा (ट्री मॉस्क्‍युटो) काहीसा प्रभावही वाढण्यास ढगाळ वातावरण अनुकूल ठरले होते. असे असतानाही यंदाच्या मोहोराने धारणेत बऱ्यापैकी मजल मारलेली दिसून येत आहे. 

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार जिल्ह्यात यंदा ८५ टक्‍क्‍याच्या आसपास मोहोरधारणेची प्रक्रिया पुर्ण झाली आहे. जानेवारी ते फेब्रुवारीच्या सुरवातीला चांगल्यापैकी थंडी मिळाली. हा काळ मोहोरासाठी फार अुनकूल ठरल्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा चांगली मोहोरधारणा निर्माण झाली. कृषी तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार यंदा उशिरा बाजारात दाखल होणाऱ्या आंब्यावर दरम्यानच्या ढगाळ वातावरणाच्या कारणामुळे आता ही अनिश्‍चितता वाढली आहे. तरीही तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार आता मार्च अखेरीपर्यत हापूस हाताला लागण्याची शक्‍यता असून मे पर्यंत हा हंगाम चालु आहे.

पाऊस वेळेवर दाखल झाल्यास काहीसा आंबा पाऊसाच्या गर्तेतही सापडण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. गेल्यावर्षी एवढाच हापूस बाजारपेठेत उपलब्ध होण्याची शक्‍यता असली तरी एकदम संग्रहीतरित्या आंबा बाजारात दाखल होण्यामुळे दरावर चांगलाच परिणाम होणार आहे. बागायतदारांसाठी ही मोठी चिंतेची बाब ठरणार असून आंबा सुरक्षितेबरोबरच काढणीवर दलाल व आर्थिक नियोजनाची गणितांची सांगड यंदा वेगळ्याप्रकारे घालताना दिसून येणार आहे. 

तापमानाचे आव्हान 
आधीच आंब्याला पावसाळी, हिवाळी हंगामाचा तडाखा बसला. तर प्रतिकूल वातावरणातही तरून गेलेल्या आंब्यासमोर आता योग्य कमाल तापमान मिळणे आवश्‍यक आहे. अन्यथा बागायतदारांकडून आता घालण्यात येत असलेली आर्थिक नियोजनाची गणिते कोलमडण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. सर्वसाधारणपणे ३२ अंशपर्यंत तापमान राहणे आवश्‍यक आहे. गेल्या वर्षी आंब्याला कमाल तापमानाच्या प्रतिकूल परिणामाला सामोरे जावे लागले होते. यंदाही तापमानात वाढ होण्यामुळे फळगळ होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे उत्पादन घटण्यावर टांगती तलवार कायम आहे. 

उशिराने दाखल झालेल्या हापूससमोर यंदा विविध संकटे येण्याची चिन्हे आहेत. ओखीमुळे बऱ्यापैकी हापूस आंबा प्रभावित झाला आहे. ३५ अंशच्या पुढे तापमान गेल्यास मोठ्या प्रमाणात फळगळ होण्याची शक्‍यता आहे. यापेक्षाही तापमान वाढल्यास पानगळही होणार आहे. मार्चपर्यंत फळधारणा होणार असून यंदा बाजारपेठेत एकाच वेळी दाखल होणार आहे.
- बी. एन. सावंत, 

विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ, फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ले

मागच्यावेळी मोहोर कमी आला होता मात्र यंदा उशिराने असला तरी चांगला मोहोर आल्याचे जाणवते. फळगळ न होण्यासाठी बागायतदारांनी वेळीच काळजी घेणे आवश्‍यक आहे. पुरेसे पाणी आंब्याला देणे फायदेशीर ठरणार आहे.
- डॉ. किरण मालशे,

प्रभारी अधिकारी, फळसंशोधन केंद्र, देवगड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com