ओडिशातील ‘त्या’ मुलांना मिळाला शाळेत प्रवेश

ओडिशातील ‘त्या’ मुलांना मिळाला शाळेत प्रवेश

दोडामार्ग - तालुक्‍यातील संवेदनशील पत्रकारांच्या प्रयत्नाला अखेर यश मिळाले. येथील भारतमाता की जय संघ आणि पत्रकारांच्या पुढाकाराने ओडिशातील ती दोन्ही मुले सोमवारी दोडामार्ग सावंतवाडा येथील शाळेत दाखल करण्यात आली. त्यांच्या शाळा प्रवेशाचा पहिला दिवस शाळेने उत्सवरूपाने साजरा केला. मुलांचे औक्षण करून पुष्प देऊन शिक्षकांनी त्यांना शाळेत दाखल करुन घेतले. लक्ष्मीला दुसरीत तर सोनूला पहिलीत दाखल करण्यात आले.

ओडिशामधील एक कुटुंब दोडामार्ग तिलारी मार्गालगत गावकुसाबाहेर अगदी हलाखीत राहत होते. त्यात लक्ष्मी आणि सोनू ही दोन मुले तर गंगा ही त्यांची आई काटक्‍यांची झोपडी उभारून राहत होती. खायला अन्न नसल्याने शिळंपाक, उष्टं-खरखटं खाऊन दिवस काढत होती. अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्यसेवा आणि शिक्षणापासून वंचित राहिलेल्या त्या कुटुंबाकडे तालुक्‍यातील पत्रकार प्रभाकर धुरी, लखू खरवत, राजाराम गवस यांनी संवेदनशीलतेने पाहून त्याबाबत बातम्यांच्या माध्यमातून समाजाचे लक्ष वेधले. शिवाय स्वतः जीवनावश्‍यक साहित्य व रोख रक्कम देऊन मदतही केली.

त्यानंतर अनेकांचे मदतीचे हात पुढे आले. भारतमाता की जय संघ हा त्यातील एक संघाचे तालुक्‍याचे पालक अध्यक्ष श्रीगणेश गावडे, सचिव वैभव रेडकर आणि अन्य पदाधिकारी यांनी त्या कुटुंबाची जबाबदारी उचलली. त्यांना मूलभूत सुविधा पुरविण्याची ग्वाही दिली आणि प्रत्यक्ष कामही सुरू केले. त्यांची राहण्याची, जेवणाची व्यवस्था केली. आंबडगाव येथील शिक्षिका मेदिनी सावईकर यांनी त्या कुटुंबाला आवश्‍यक कपडे दिले. त्यानंतर पत्रकार आणि संघ पदाधिकारी यांनी मिळून त्या दोन्ही मुलांना शाळेत दाखल केले. 

सकाळीच शाळेचा वेष परिधान करुन लक्ष्मी आणि सोनू ही दोन्ही मुले आपल्या राहत्या घरातून शाळेकडे निघाली. जाताना त्यांनी ज्येष्ठ व्यक्तींना वाकून नमस्कार करत त्यांच्यामधील संस्कारांचे दर्शन घडविले. शाळेत गेल्यावर त्‌ मुख्याध्यापक श्रीमती बिर्जे आणि शिक्षक प्रशांत निंबाळकर यांनी दोघांचे स्वागत केले.

सद्य:स्थितीत मुलांच्या राहण्याची, जेवण्याची आणि शिक्षणाची सोय झाली असली तरी हा प्रवास इथेच थांबणारा नाही. अजून त्यांच्या मूळ गावाचा पत्ता मिळवायचा आहे. दोन्ही मुलांच्या आईला आपला पूर्ण पत्ता आणि पूर्ण नाव सांगता येत नाही. ते मिळवायचे आहे. तिच्यासाठी वैद्यकीय सुविधा मिळवून द्यायच्या आहेत. जोपर्यंत कुटुंबाचे योग्य पुनर्वसन होत नाही, मुलांचे पालनपोषण करण्यासाठी ती माऊली सक्षम होत नाही. शाश्वत उपजीविकेचा मार्ग तिच्यासाठी खुला होत नाही तोपर्यंत अनेक हातांच्या मदतीची त्या कुटुंबाला गरज आहे. त्यासाठी समाजातील संवेदनशील व्यक्तींनी पुढे येण्याची गरज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com