सावंतवाडी - मडुरा की मळगाव अशा वादात अनेक वर्षे रखडल्यानंतर मार्गी लागलेल्या सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे काम आता वेगळ्याच अडचणीत सापडले आहे. दुसर्या भागाचे काम करण्यासाठी निधी उपलब्ध होत नसल्याचे कारण पुढे करुन हे काम गुंडाळण्याचा प्रयत्न रेल्वे प्रशासनाकडुन सुरू आहे. यात तिकीट घर आणि वेटींग रुमच्या कामाचा समावेश आहे.
दरम्यान जिल्ह्याचे शेवटचे टोक म्हणून आणि दुसरीकडे लोकांची मागणी व पर्यटन जिल्हा अशा अनेक गोष्टी लक्षात घेता, रेंगाळलेले काम मार्गी लावण्यासाठी प्रशासनाकडुन योग्य ते प्रयत्न करण्यात यावेत, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा तालुका शिवसेनेच्यावतीने देण्यात आला आहे
सावंतवाडी तालुक्यात मळगाव येथे रेल्वे टर्मिनस उभारण्यात येणार होते. त्या ठिकाणी जिल्ह्यातून जाणार्या सर्व गाड्या थांबविण्याचा पालकमंत्री दिपक केसरकर आणि तत्कालीन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांचा मानस होता. दरम्यान जागेच्या सततच्या वादानंतर हे रेल्वे टर्मिनस मार्गी लागले होते. यासाठी दिवगंत माजी आमदार जयानंद मठकर यांना लढा द्यावा लागला होता.
लोकांच्या मागणीनंतर मळगाव या ठिकाणी रेल्वे टर्मिनस उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. त्यासाठी निधी सुध्दा मंजूर झाला होता. त्यातील एका फेजचे काम अंतीम टप्प्यात आले होते, तर दुसर्या फेजचे काम सुरू होते. दरम्यान सध्यस्थिती लक्षात घेता हे काम बंद आहे. याबाबत शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी माहीती मिळविली असता निधी उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करत टर्मिनसचा काही भाग गुंडाळण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे काही अधिकार्यांकडुन सांगण्यात आले.
दरम्यान शिवसेनेकडुन याबाबत आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे स्टेशनमास्तर संतोष महाजन यांना निवेदन देण्यात आले. रेंगाळलेले काम तात्काळ सुरु न केल्यास रस्त्यावर उतरु असा इशारा उपस्थित शिवसैनिकांनी दिला आहे
जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश परब, मायकल डिसोझा, मेघ:शाम काजरेकर, राजू शेटकर, समीर मामलेकर, चंद्रकांत कासार, मंगलदास देसाई, दिलीप सोनुर्लेकर, सुनील देसाई, भाऊ देवळी, चंद्रकांत नेवगी, बाबू गावडे, सहदेव राऊळ, दाजी सावंत, विभाग प्रमुख विनोद काजरेकर, विनोद ठाकूर, महेश शिरोडकर, योगेश नाईक, सुभाष मयेकर, दत्ताराम पेडणेकर, महेंद्र परब, प्रशांत बुगडे, शरद जाधव आदी उपस्थित होते.
निधी नसल्याच्या कारणाने काम बंद
दुसर्या फेजचे ठेकेदाराने काम सुरु केले होते परंतू रेल्वे प्रशासनाकडुन निधी नसल्याचे कारण दाखवुन इमारतीसाठी उभारण्यात येणारे पिलरचे खड्डे बुझविण्यात आले तसेच इमारत बांधकाम न करण्याचा परस्पर निर्णय घेतला आहे त्यामुळे हे काम होणार की नाही याबाबत शंका आहे
रेल्वे टर्मिनस व्हावे अशी लोकांची मागणी होती त्यासाठी आंदोलन सुध्दा झाले होते असे असताना निधी नसल्याचे कारण पुढे करुन कोणी काम रद्द होण्यासाठी प्रयत्न करीत असेल तर ते आम्ही यशस्वी होवू देणार नाही. यासाठी पालकमंत्री दिपक केसरकर, खासदार विनायक राउत यांच्या माध्यमातून आम्ही पाठपुरावा करणार आहोत. त्याच बरोबर पुन्हा काम सुरू होई पर्यत आमचे आंदोलन सुरूच राहणार आहे
- रुपेश राउळ, तालुकाप्रमुख तथा पंचायत समिती सदस्य
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.