मंत्री असताना राणे गप्प का होते?

मंत्री असताना राणे गप्प का होते?

मालवण - नारायण राणे अनेक वर्षे सत्तेत तसेच मंत्री असताना त्यांनी पर्ससीन, एलईडी मासेमारीवर बंदी का आणली नाही? सभागृहात पर्ससीनच्या विरोधात आवाज का नाही उठविला? राणेंचे पारंपरिक मच्छीमारांवर आता उफाळून आलेले प्रेम हे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पुतना-मावशीचे आहे. किनारपट्टीवरील मच्छीमार राणेंच्या बदलत्या भूमिकांवर कधीही विश्‍वास ठेवणार नाही. राणेंनी आजपर्यंत पर्ससीनधारकांचीच बाजू घेत पारंपरिक मच्छीमारांवर खोटे गुन्हे दाखल केले आहेत, अशी टीका आमदार वैभव नाईक यांनी येथे पत्रकार परिषदेत केली. 

नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्या कक्षात पत्रकार परिषद झाली.  या वेळी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर, नगरसेवक पंकज सादये, नगरसेविका तृप्ती मयेकर, आकांक्षा शिरपुटे, सुनीता जाधव, किरण वाळके, तपस्वी मयेकर, स्वप्नील आचरेकर, प्रवीण रेवंडकर, प्रवीण लुडबे यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

शिवसेना मच्‍छीमारांच्या पाठीशी...
येथील मच्छीमारांनी आक्रमकपणे परप्रांतीयांच्या नौका पकडून आणल्यानंतर पोलिसांकडून सध्या सुरू असलेली धरपकड मोहीम ही शिवसेनेमुळेच थांबली आहे. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधून वस्तुस्थिती सांगितल्यानंतर त्यांनी पोलिस प्रशासनास याबाबतचे आदेश दिले आहेत. एकाही मच्छीमारांवर चुकीच्या पद्धतीने कारवाई होऊ दिली जाणार नाही. पारंपरिक मच्छीमारांच्या पाठीशी शिवसेना खंबीरपणे उभी असल्याचेही नाईक यांनी या वेळी सांगितले.

या वेळी नाईक म्हणाले,‘‘पर्ससीननेटच्या मासेमारी विरोधात सातत्याने शिवसेनेने आवाज उठविला. शासनाने केलेल्या पाठपुराव्यामुळेच पर्ससीननेटच्या मासेमारीवर मुख्यमंत्र्यांनी बंदी घातली आहे. आता प्रकाश झोतातील मासेमारीमुळे संघर्ष होत असल्याने येत्या अधिवेशनात या विषयावरही आवाज उठविणार आहे. पारंपरिक मच्छीमारांच्या प्रत्येक आंदोलनात शिवसेना पुढे राहिली आहे. याउलट आचरा राडाप्रकरणी राणेंनी पर्ससीन धारकांची बाजू घेत पारंपरिक मच्छीमारांवर गुन्हे दाखल करण्यास भाग पाडले हे पारंपरिक मच्छीमार विसरलेले नाहीत.’’ 

ते म्हणाले, ‘‘पारंपरिक मच्छीमारांनी सहाय्यक मत्स्य आयुक्‍त यांना हटविण्याची मागणी केली आणि कार्यालय मालवणातच राहावे असे सांगितले त्यानुसार ही दोन्ही कामे आठ दिवसात मार्गी लावली. शिवसेनेचे एक अंग मच्छीमार समाज आहे. या समाजाच्या सुखदुःखात शिवसेना सहभागी झाली आहे.

अधिकाऱ्यांवर बांगडा फेक आंदोलन केल्यानंतर आमदार 
नीतेश राणे कधीही मच्छीमारांच्या प्रश्‍नासाठी येथे आले नाही तर माजी खासदार नीलेश राणे हे पराभूत झाल्यानंतर कधीही मच्छीमारांच्या समस्या जाणून घेण्यास येथे आले नाहीत. आता निवडणुका जवळ आल्याने त्यांना मच्छीमारांचा पुळका आला आहे. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने जो मोर्चा जाहीर केला आहे तो पर्ससीनधारकांसाठी आहे की, मच्छीमारांवर झालेल्या अन्यायाबाबत आहे हे त्यांनी स्पष्ट करायला हवे. हा मोर्चा म्हणजे त्यांचा एक स्टंट आहे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com