सुधागड शेतकरी संघर्ष समन्वय समिती आक्रमक

pali
pali

पाली - वाकण पाली खोपोलीमार्ग 548 (अ) या 41 किमी महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम वेगात सुरु आहे. रुंदिकरणादरम्यान मालकी जागेची संयुक्त मोजणी करण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकरी सातत्याने करीत आहेत. परंतु, भूमि अभिलेख उपअधिक्षक कार्यालय पाली सुधागड यांच्याकडून जाणीवपुर्वक टाळाटाळ होत असल्याचा आरोप सुधागड शेतकरी संघर्ष समन्वय समितीचे अध्यक्ष प्रमोद मोरे यांनी केला आहे.

ताबडतोब जागेची संयुक्त मोजणी न केल्यास आणि जमीनीचा योग्य मोबदला न दिल्यास वाकण पाली खोपोली महामार्गालगतचे १९ गावांचे शेतकरी रास्ता रोको करणार आहेत. शेतकरी संघर्ष समन्वय समितीने नुकत्याच पालीतील मरिमाता मंदिरात आयोजीत केलेल्या बैठकीत जाहीर केले. या रस्ता रुंदीकरणादरम्यान रस्त्यालगतच्या शेतकर्‍यांच्या पुर्वापार व वडीलोपार्जीत असलेल्या जमिनीसह घरे, दुकाने, झाडे व लहानमोठ्या व्यवसायांचे मोठे नुकसान होत आहे. प्रशासनाने दिलेल्या कोणत्याही आश्वासनाची पुर्तता होत नसल्याने शेतकरी संतप्त झालेले आहेत. 

तसेच रस्ता रुंदिकरणाचे काम अतिशय असुरक्षित व धोकादायकरित्या होत असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. यापुढे होणार्‍या अपघातास महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकारी व ठेकेदार यांना जबाबदार धरण्यात यावे अशी मागणी देखील शेतकरी संघर्ष समन्वय समितीने केली आहे. तसेच आ. सुनिल तटकरे यांची भेट घेवून आंदोलनाची पुढील दिशा ठरविणार आहेत.. यावेळी सुधागड शेतकरी संघर्ष समन्वय समितीचे अध्यक्ष प्रमोद मोरे, उपध्यक्ष चंद्रकांत शिंदे, सचिव गिरीष काटकर, मनोहर देशमुख, सचिन तेलंगे, सविता शिर्के, बाळाराम काटकर,रविंद्रनाथ ओव्हाळ, संजय काटकर, विक्रम देशमुख आदिंसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

न्याय कधी मिळणार?
वाकण पाली खोपोली रस्ता रुंदीकरणादरम्यान वाढीव जमीन भुसंपादीत होत असल्याने नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना योग्य मोबदला मिळावा या मागणीकरीता शेतकर्‍यांनी शेतकरी संघर्ष समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली काही दिवसांपुर्वी पाली तहसिलकार्यालयासमोर आमरण उपोषण केले होते. तसेच अनेकदा आपल्या मागण्यांसाठी रॅली, मोर्चे व बैठका देखील घेण्यात आल्या आहेत. यावेळी उपोषणकर्त्यांना तत्कालीन राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. सुनिल तटकरे यांनी न्याय मिळवून देण्याची भूमिका घेतली. त्यानुसार सुनिल तटकरे यांनी विधान परिषदेत लक्षवेधी सुचना मांडून रायगड कोकणातील शेतकर्‍यांचा विकासाला मुळीच विरोध नाही. मात्र शेतकर्‍यांच्या संसारावर नांगर फिरवून होत असलेल्या विकासाला आमचा विरोध आहे. व कायम राहील अशी भूमिका मांडून रस्ता रुंदीकरणादरम्यान शेतकर्‍यांच्या जागेची संयुक्त मोजणी करुन शेतकर्‍याचे नेमके किती क्षेत्र रुंदीकरणात जात आहे याची माहिती द्यावी. तसेच मुंबई गोवा महामार्गावरील शेतकर्‍यांना भुसंपादनादरम्यान जो भाव दिला तोच मोबदला पाली खोपोली मार्गावरील शेतकर्‍यांना देखील मिळावा अशी मागणी आ. तटकरे यांनी लावून धरली होती. 

यावर सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी रुंदिकरणादरम्यान कोणत्याही शेतकर्‍यावर अन्याय होऊ देणार नाही अशी भुमिका अधिवेशनात स्पष्ट केली. परंतु, दोन महिन्याचा कालावधी उलटून देखील भूमि अभिलेख उपअधिक्षक कार्यालयाकडून संयुक्त मोजणीस दिरंगाई होत असल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com