पोलादपूर / कणकवली (सिंधुदूर्ग) : कणकवली येथून मुंबईकडे निघालेल्या खासगी आराम बसने आज पहाटे पेट घेतला. पोलादपूर चरई फाटा दरम्यान गाडीचे मागील टायर गरम होऊन पेट घेतल्याने बस पूर्णपणे जळाली. यामध्ये सुदैवाने गाडीत प्रवास करणारे सर्व प्रवासी सुखरूप असलेची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे.
गाडीचे टायर गरम झाले अन्
खासगी आराम बस (एमएच. ४ एफके ०००९) ही पहाटे दोनच्या सुमारास पोलादपूर तालुक्याच्या हद्दीत आली असताना गाडीचे टायर गरम झाले असल्याचा वास काही काळापासून येत होता. लोहार माळ जवळ येताच या टायरने अचानक पेट घेतला. संबंधित आगीचे वृत्त समजताच महाड औद्योगिक वसाहतीचा अग्निशमन बंब ताबडतोब घटनास्थळी दाखल झाला; मात्र बस जळून खाक झाली.
४८ प्रवासी सुखरूप
चालक विद्यानंद किलोस्कर (वय ३८) यांच्यासह गाडीतील सर्व ४८ प्रवासी सुखरूप असल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थ, अग्निशमनदलाच्या जवानांकडून प्राप्त झाली.
बसला लागलेल्या आगीमुळे काही मीटरवर आगीचे लोट दिसून येत होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्तीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले; मात्र तो पर्यंत बस खाक झाली. याबाबत अधिक तपास सपोनी प्रशांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जे. जी. पवार करीत आहेत.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.