उत्तेजक सेवनावर बंधने हवीतच - बॅश

उत्तेजक सेवनावर बंधने हवीतच - बॅश

नवी दिल्ली - राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील भारतीय खेळाडूंच्या यशाचे कौतुक करतानाच आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे अध्यक्ष थॉमस बॅश यांनी भारतीय खेळाडूंकडून झालेल्या ‘नो नीडल’ पॉलिसी भंग प्रकरणाची देखील गंभीर दखल घेतली. केवळ स्पर्धेतच नाही, तर ही योजना शिबिरातही वापरण्यात यावी, असे मत त्यांनी आपल्या भारत भेटीत गुरुवारी व्यक्त केले. 

भारत दौऱ्यावर आलेल्या बॅश यांनी उत्तेजकांच्या प्रश्‍नावर परखड मत व्यक्त करीत भारतास जणू इशाराच दिला. यापूर्वीच उत्तेजक प्रकरणामुळे टोकियो ऑलिंपिकमधील भारतीय वेटलिफ्टिंग खेळाडूंच्या सहभागावर मर्यादा येऊ शकतात, असे संकेत जागतिक वेटलिफ्टिंग महासंघाने दिले आहेत. २००८ ते २०२० या दरम्यान २० वेटलिफ्टिंग खेळाडू दोषी आढळलेल्या देशांवर निर्बंध आणण्याचा विचार सुरू आहे. बॅश यांनी या निर्णयाचे स्वागत करीत भारतीय वेटलिफ्टिंग खेळाडूंचा सहभाग वाढण्याची शक्‍यता कमी असल्याचे सूचित केले.

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेपूर्वी भारतीय बॉक्‍सरकडून तर स्पर्धा सुरू असताना ॲथलिट्‌सकडून नो नीडल पॉलिसीचा भंग झाला होता. जणू याची आठवण करून देत बॅश यांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धांत उत्तेजकांचा वापर न करणाऱ्या खेळाडूंनीच पदके जिंकायला हवीत, असे मत व्यक्त केले होते. त्याचबरोबर त्यांनी याच ओघात शिबिरातही या धोरणाची अंमलबजावणी करायला हवी, असा आग्रह धरल्याचे समजते.

ऑलिंपिक पूर्वतयारीसाठी साह्य
दोन वर्षांनी होणाऱ्या ऑलिंपिकमध्ये भारताची कामगिरी चांगली होण्यासाठी आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीही साह्य करेल, असे बॅश यांनी सांगितले. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून भारतीयांनी आपली उच्च क्षमता दाखवून दिली आहे. आता ऑलिंपिकमध्येही भारताने जास्तीत जास्त पदके जिंकावीत. आम्ही यासाठी साह्य करण्याची तयारी दाखवली आहे. त्यासाठी वर्किंग ग्रुप स्थापन होणार आहे. त्यात आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती, आशिया ऑलिंपिक परिषद, भारतीय ऑलिंपिक संघटना, तसेच क्रीडा मंत्रालयाचा एक प्रतिनिधी असेल. खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचे मार्गदर्शन लाभेल, असे बॅश यांनी सांगितले.

तरी स्पर्धांसाठी भारताचे प्रयत्न
विविध स्पर्धा घेण्यासाठी ही योग्य वेळ नव्हे, असे बॅश यांनी सांगितल्यावरही भारतीय ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष नरिंदर बत्रा यांनी भारत २०२६ चे युवा ऑलिंपिक, २०३०च्या आशियाई क्रीडा स्पर्धा आणि २०३२च्या ऑलिंपिक संयोजनासाठी प्रयत्न करणार आहे. भारत युवा ऑलिंपिक संयोजनास उत्सुक आहे. भारतीय खेळाडूंसाठीही हे फायदेशीर असेल; पण त्याची अद्याप वेळ आलेली नाही. भारत नक्कीच एक दिवस ऑलिंपिक स्पर्धा घेऊ शकेल, असे बॅश यांनी सांगितले. नव्या निकषामुळे आता संयोजनाचा खर्च एक अब्ज डॉलरने कमी झाला आहे, याकडेही बॅश यांनी लक्ष वेधले.

संघटना कारभारात पारदर्शकता स्वागतार्ह; पण..
स्वायत्तता आणि चांगले प्रशासन एकाच नाण्याच्या बाजू असल्याचे बॅश यांचे मत
क्रीडा संघटनांची स्वायत्तता आवश्‍यक, हस्तक्षेप केल्यास आंतरराष्ट्रीय पाठिंबा नाही
चांगल्या प्रशासनाचे भारतीय ऑलिंपिक संघटनेकडून आश्वासन
सरकारनेही क्रीडा संघटनांचे हक्क जपायला हवेत
आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीची साह्याची तयारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com