कोलकत्ता - भुवनेश्वर कुमार (8 धावा - 4 बळी) व मोहम्मद शमी (34 धावा - 2 बळी) या भारतीय वेगवान गोलंदाजांच्या प्रभावी माऱ्यासमोर आज (सोमवार) विजयासाठी 231 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेची अवस्था 7 बाद 75 अशी झाली. अखेर पुरेशा प्रकाशा अभावी खेळ थांबवावा लागल्याने या सामना अनिर्णित घोषित करण्यात आला. सामन्याच्या पहिल्या एक- दोन दिवसांचा बराचसा वेळ पावसामुळे वाया गेल्यानंतर दोन्ही संघाच्या गोलंदाजांनी धारदार गोलंदाजी केल्याने सामन्यात रंगत निर्माण झाली होती.
भारतीय वेगवान गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासहित पहिल्या डावात अपयशी ठरल्यानंतर भारतीय कर्णधार विराट कोहली (104 धावा - 119 चेंडू) याने झळकाविलेले नाबाद शतक हेदेखील आजच्या खेळाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले. मात्र सलामीवीरांच्या भक्कम सलामीनंतर कोहलीचा अपवाद वगळता अन्य कोणताही भारतीय फलंदाज प्रभावी फलंदाजी करु शकला नाही. श्रीलंकेकडून आर. लकमल (93 धावा - 3 चेंडू) व एम शनाका (76 धावा - 3 बळी) यांनी भारतीय फलंदाजांना रोखण्यात महत्त्वाचे योगदान दिले.
भारत व श्रीलंकेमध्ये खेळविण्यात येणाऱ्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेमधील हा पहिला सामना अनिर्णित राहिला आहे. या सामन्यात भारतीय फिरकीपटूंस एकही बळी मिळविता आला नाही. श्रीलंकेचे सर्व बाद फलंदाज हे वेगवान गोलंदाजांचेच बळी ठरले! भारतात खेळविण्यात आलेल्या गेल्या 262 कसोटींत असे प्रथमच घडले आहे. या सामन्यात भारतीय वेगवान गोलंदाजांनी तब्बल 17 बळी मिळविले. भारतीय वेगवान गोलंदाजांनी एका कसोटी सामन्यात मिळविलेल्या बळींचा हा सर्वोच्च आकडा आहे.
|