मुंबई / नवी दिल्ली - राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा संयोजनाच्या शर्यतीत भारतानेही उडी मारली असल्याची चर्चा आहे. 2022 ची स्पर्धा घेण्यात डर्बनने (दक्षिण आफ्रिका) असमर्थतता दाखवल्याने या स्पर्धेच्या यजमानपदाबद्दल नव्याने निर्णय होणार आहे.
भारतात 2010 मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा झाली होती. नवी दिल्लीतील या स्पर्धेसाठी असलेल्या स्टेडियमला तयार होण्यास झालेला उशीर, तसेच या स्पर्धेच्या आयोजनातील भ्रष्टाचाराची जास्त चर्चा झाली होती. तरीही भारतीय ऑलिंपिक संघटना राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा घेण्याचा नव्याने विचार करत आहे. दिल्ली राष्ट्रकुल स्पर्धेचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे 2018 च्या स्पर्धा होतील. त्यांनी सलग दोन स्पर्धांना तयार असल्याचे कळवले आहे.
राष्ट्रकुल क्रीडा महासंघानेच याबाबत विचारणा केली आहे. आम्ही त्याबाबत विचार करत आहोत. भारत सरकारने पाठिंबा दिला, तर या स्पर्धेच्या यजमानपदासाठी प्रयत्न करण्याचा आमचा विचार आहे, असे भारतीय ऑलिंपिक संघटनेचे सचिव राजीव मेहता यांनी सांगितले. 2022 मध्ये भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आहे. त्यामुळे या स्पर्धेच्या आयोजनास पाठिंबा मिळू शकेल, अशी चर्चा आहे.
डर्बनच्या माघारीनंतर इंग्लंडमधील दोन शहरांनी स्पर्धा घेण्याची तयारी दाखवली आहे. तरीही राष्ट्रकुल क्रीडा महासंघाने या स्पर्धेच्या यजमानपदासाठी शोध सुरू असल्याचे सांगितले होते. विश्वकरंडक फुटबॉल संयोजनातून काहीही साध्य झालेले नसताना राष्ट्रकुल स्पर्धेचा घाट कशाला? अशी टीका आफ्रिकेत झाली आणि त्यांनी संयोजनातून माघार घेतली.
|