लखनौ - मलेशिया मास्टर्स स्पर्धेत विजेतेपद मिळविल्यानंतर साईना नेहवाल हिने भारतात उद्या मंगळवारपासून सुरू होणाऱ्या सईद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्यामुळे भारताच्या सर्व आशा ऑलिंपिक रौप्यपदक विजेत्या पी. व्ही. सिंधूवर अवलंबून असतील.
साईनाने या स्पर्धेतील माघारीचे समर्थन केले. ती म्हणाली,""गुडघ्याच्या दुखापतीनंतर पुनरागमन करताना गेले तीन आठवडे माझ्यासाठी व्यग्र गेले. प्रथम बॅडमिंटन लीग आणि नंतर मलेशिया ओपन स्पर्धेत मी खेळले. मी अजूनही शंभर टक्के तंदुरुस्त नाही. त्यामुळे मी हा निर्णय घेतला. अर्थात, गेल्या काही आठवड्यात झालेल्या माझ्या कामगिरीवर मी निश्चित समाधानी आहे.''
साईनाने माघार घेतल्याचे जाहीर केल्यानंतरही आयोजकांनी या स्पर्धेसाठी तिला दुसरे मानांकन जाहीर केले. सिंधूला अव्वल मानांकन असून, तिची पहिल्या फेरीत अनुरा प्रभुदेसाई हिच्याशी गाठ पडणार आहे. तिची आगेकूच कायम राहिल्यास उपांत्य फेरीत तिची गाठ फित्रिआनीशी पडू शकते.
पुरुष विभागातून के. श्रीकांतवर भारताच्या आशा आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर गेल्यावर्षी चांगले यश मिळविल्यानंतर गेले चार महिने तो घोट्याच्या दुखापतीने कोर्टपासून दूर होता. श्रीकांत म्हणाला,""मी यशस्वी पुनरागमन करण्यास उत्सुक आहे. सईद मोदी स्पर्धेतील विजेतेपद टिकवू शकेन, असा मला विश्वास वाटतो. येथे विजेतेपद मिळविल्यास उर्वरित मोसमासाठी मला आत्मविश्वास मिळेल.''
|