भारतीय संघाचा माजी क्रिकेट वसीम जाफर याने पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया (Pakistan Vs Australia) यांच्यातील कसोटीसंदर्भात ट्विट केले आहे. चार दिवसाच्या खेळात दोन्ही संघानी मिळवून 900 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. तर केवळ 11 विकेट पडल्या आहेत. त्यामुळे रावळपिंडीची खेळपट्टी डेड पिच वाटते. डेड पिच हे डेड गेमप्रमाणे असते, असा टोलाही त्याने या खेळपट्टीवरुन पाकिस्तानला लगावला आहे. पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेला 4 मार्च पासून सुरुवात झाली. पहिला सामना रावळपिंडीच्या मैदानात रंगला आहे. हा सामना अनिर्णिततेकडे झुकल्याचे दिसते. वसीम जाफर (Wasim Jaffer)ने कठोर शब्दांत खेळपट्टीवर ताशेरे ओढले आहेत.
कसोटी सामना चार दिवसांच्या आत संपणे ही गोष्ट मनोरंजक वाटते. कसोटीचा निकाल पाचव्या दिवसावर जाणं ही वाईट गोष्ट नाही. पण डेड पिच कसोटी क्रिकेटसाठी धोकादायक आहे, अशा शब्दांत त्याने पाकिस्तानचे कान टोचले आहेत. पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या सामन्यापूर्वी अनेक क्रिकेट तज्ज्ञांनी खेळपट्टीवर टीका केली होती. ऑस्ट्रेलियन ब्रॉडकास्टनेही या खेळपट्टीला डेड पिच म्हटले होते. फॉक्स क्रिकेटने आधिकारिक ट्विटर अकाउंटवरुन एक फोटो शेअर केला होता. यात खेळपट्टी एकदमच खराब असल्याचे दिसून येत होते.
रावळपिंडीच्या मैदानातील पहिल्या कसोटी सामन्यात पाकिस्तान संघाने टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. शफिक 44 धावा करुन माघारी फिरल्यानंतर इमाम उल हक 157, अझर अली 185 धावा केल्या. या दोघांच्या मोठ्या खेळीच्या जोरावर पाकिस्तानने पहिल्या डावात 476 धावा केल्या. ऑस्ट्रेलियानेही याला चोख प्रत्युत्तर दिले. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाने 7 बाद 449 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजानं सर्वाधिक 97 धावा केल्या. त्याच्याशिवाय मार्नस लाबुशेने (90), डेविड वॉर्नर (68) आणि स्टीव्ह स्मिथनं 78 धावांची खेळी केली.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.