Maratha Kranti Morcha: आज महाराष्ट्र बंद

Maratha-Kranti-Morcha
Maratha-Kranti-Morcha

औरंगाबाद, मुंबई - मराठा आरक्षणासाठी आज (गुरुवार) महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. अहिंसक, असहकाराने आंदोलन करण्यावर शिक्‍कामोर्तब झाले आहे. औरंगाबादेत झालेल्या समन्वयकांच्या राज्यव्यापी बैठकीत आज हा निर्णय घेण्यात आला. बंदमधून अत्यावश्‍यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. या बंदमधून मुंबई, ठाणे, नवी मुंबई यांना वगळण्यात आले आहे.

राज्यव्यापी बैठकीनंतर समन्वयकांनी पत्रकार परिषदेत भूमिका स्पष्ट केली. समन्वयक म्हणाले, 'मराठा आरक्षणासाठी एकेक जीव जात आहे. तरुणांचा सरकारवर विश्‍वास राहिला नाही. मात्र, न्यायालयावर आणि आपल्या आंदोलनावर विश्‍वास ठेवला पाहिजे. समाजबांधवांनी आत्महत्या करू नयेत; तसेच कोपर्डी प्रकरण स्मरणात ठेवून क्रांती दिनाचे आंदोलन शांततेत करावे, हिंसेला थारा देऊ नये.''

'सरकारनेही शब्दच्छल करू नये, आत्मबलिदान करणाऱ्यांना 50 लाखांची मदत आणि कुटुंबीयांना नोकरीत घ्यावे. आंदोलनातून समाजबांधवांवर गंभीर गुन्हे दाखल होत आहेत. मराठा समाजाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न सरकार आणि समाजकंटकाकडून होतोय. त्यासाठी स्वत:लाच शिक्षा म्हणून 15 ऑगस्टपासून चूलबंद आंदोलन करण्यात येणार आहे. एकवेळचा अन्नत्याग करण्यात येईल,'' असे समन्वयकांनी स्पष्ट केले.

राज्यव्यापी बैठक तब्बल तीन तास चालली. राज्यभरातील बहुतांश जिल्ह्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते, तर नऊ जिल्हा समन्वयकांनी संदेशाद्वारे आपण जो निर्णय घ्याल, तो आम्हाला मान्य असल्याचे कळविले होते. आंदोलनाबाबत प्रत्येकाने आपापली भूमिका मांडली. त्यानंतर महाराष्ट्र बंदचा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, नोकरदारवर्गाची फार गैरसोय होऊ नये यासाठी मुंबई आणि ठाणे बंद मधून वगळण्यात आले आहे. तसेच, तणावात्मक परिस्थितीमुळे नवी मुंबईतही बंद केला जाणार नाही. मात्र, या ठिकाणी ठिय्या आंदोलन केले जाणार आहे. गेल्याच महिन्यात पुकारण्यात आलेल्या संपात मुंबईकरांनी चांगली साथ दिल्याने वारंवार लोकांना वेठीस धरणे योग्य नसल्याचे सांगत या तीनही शहरांना बंदमधून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आंदोलकांची भूमिका
- सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत महाराष्ट्र बंद
- आंदोलनादरम्यानचे गुन्हे सरसकट मागे घेण्यात यावेत
- गुन्हे मागे न घेतल्यास 15 ऑगस्टपासून चूलबंद आंदोलन
- तालुका, जिल्हास्तरावर 10 ऑगस्टपासून साखळी उपोषण
- आत्महत्या रोखण्यासाठी 10 ते 12 संवाद यात्रा निघणार

राज्यभरातील स्थिती
- बंदमुळे राज्यभरातील शाळांना सुटी जाहीर
- एसटी बसना टार्गेट न करण्याचे आवाहन
- वैद्यकीय सेवा सुरू राहणार
- हज यात्रेकरूंनाही वाट करून देणार
- मुख्य सचिवांकडून सुरक्षेचा आढावा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com