पानवडीची वाटचाल जलसंपदेतून धनसंपदेकडे

पानवडीची वाटचाल जलसंपदेतून धनसंपदेकडे
पानवडीची वाटचाल जलसंपदेतून धनसंपदेकडे

पुणे : धुवांधार पाऊस पडूनही पावसाळा संपताच थेंब थेंब पाण्यासाठी पानवडी आसूसलेली असायची. नावाप्रमाणंच खळाळणारी रुद्रगंगाही दिवाळीच्या आसपास शांत व्हायची... अन मग हंडाभर पाण्यासाठी बाया-बापड्यांची डोंगरकपारीत भटकंती सुरू व्हायची. वर्षानूवर्षे हटकून दिसणारं हे चित्र बदलायचं , असं तनिष्कांनी ठरवलं. दोन वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर गाव टंचाईमुक्त अन शिवार जलयुक्त झालं. बंधाऱ्यात साठलेल्या पाण्यात मत्स्यपालन करून जलसंपत्तीपासून धनसंपत्ती मिळविण्यासाठी आता तनिष्कांनी पदर खोचून सुरवात केली आहे. त्यासाठी गावतील एका बंधाऱ्यात नुकतेच मत्स्यबीज सोडले.

पुरंदर तालुक्यातील पानवडी गावाच्या बदलाची ही वाट विकासाचा मार्गच बनतेय जणू. पाच वाड्या-वस्त्यांवरील सहाशे-सातशे लोकवस्ती म्हणजे पानवडी. गावची भौगोलिक परिस्थिती म्हणायचं तर निसर्गाचा वरदहस्तच. उंच डोंगर अन दऱ्याखोऱ्या , चांगलं पर्जन्यमान. पण हे वरदानच पानवडीला शापासारखं वाटू लागलं. गावातला पाटजाई बंधारा, पाझर तलाव व काही साखळी बंधारे कालौघात गाळानं भरले. परिणामी , पाणीटंचाई. दोन वर्षांपूर्वी गावातील सुषमा भिसे व नलिनी लोळे या महिलांनी तनिष्का गट स्थापन केला. पहिल्या वर्षी म्हणजे २०१४ साली ग्रामस्थ, तरुण व महिलांना एकत्र आणून छोट्या बंधाऱ्यातील गाळ काढला. त्यातून महिनाभराची पाणीटचाई मिटली.प्रयत्न छोटा होता. फळ छोटेच मिळाले, पण हुरूप मोठा आला. दुसऱ्या वर्षी २५ जानेवारीला महिला ग्रामसभा झाली. गावातल्या मोठ्या बंधाऱयातला गाळ काढायचं ठरलं. दुसऱ्या दिवशीच्या ग्रामसभेत साऱ्या गावानं मुद्दा उचलून धरला. लोकसहभागातून तेरा लाखांचं काम झालं. सकाळनं रिलीफ फंडातून अडीच लाखांची मदत केली. राज्यात बऱ्याच ठिकाणी दुष्काळसदृश्य स्थिती असतानाही दोनच पावसांत हा बंधारा भरला. गावाला तीन वर्षे पुरेल एवढा पाणीसाठा झाला. पाणी वापराची आचारसंहिता तयार केली. परिणामी, जलसाठा नियंत्रित राहिला. म्हणूनच यंदाच्या उन्हाळ्यात निम्मा महाराष्ट्र दुष्काळाच्या झळा सोसत असताना , पानवडी जलश्रीमंत राहिली. गावातील एका वस्तीवर तर ऐन उन्हाळ्यात नळानं पाणी सुरू झालं. गावकऱ्यांनी पुन्हा एकदा गुढ्या उभारून स्वागत केलं. शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेत गावाचा समावेश होताच. तनिष्का, ग्रामस्थ, प्रशासन, खासगी कंपन्यांचे सामाजिक उत्तरदायित्त्व (सीएसआर) व माध्यमांच्या प्रयत्नांतून जवळपास दोन कोटी रुपये खर्चून पानवडीत नवे चौदा बंधारे बांधले गेले. गावकऱ्यांच्या या जिद्दीवर मग वरुणराजाही फिदा झालां. साऱ्या महाराष्ट्राबरोबरच तो पानवडीतही पुन्हा धुवांधार बरसला. रुसलेली रुद्रगंगा खळाळून वाहिली. गावच्या शिवारात जवळपास ४५ कोटी लिटरचा पाणीसाठा झाला. शेती आहे पण पाणी नाही, अशी स्थिती काही ठिकाणी असताना पानवडीनं ती बदलली. पाणी आहे पण त्यासाठी शेती नाही, अशी पानवडीची स्थिती झाली. त्यामुळं जादा झालेल्या जलसंपत्तीचा योग्यवापर करून धनसंपत्ती मिळवावी, या हेतूनं तनिष्कांनी एका बंधाऱयात मत्स्यपालन सुरू केले. मत्स्यव्यवसाय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त वाय. के. बनसोडे, पुणे विभागाचे सहआयुक्त विनय शिकरे, सहायक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी जनक भोसले, बी.एस. पाटील आदी अधिकाऱ्यांनी पानवडीची पाहणी करून मत्स्यबीज उपलब्ध करून दिले. महिला व ग्रामस्थांनी मत्स्यपालनाचे प्रशिक्षण दिले. माशांचे खाद्यमूल्य, जोपासना, संरक्षण व मत्स्यविक्री यासंबंधी माहिती दिली. गावातील बावीस बंधाऱ्यांमध्ये टप्प्याटप्प्याने मत्स्यपालन करण्याचा मनोमन निर्णय गावाने केला आहे. जलसंधारणाच्या प्रयत्नांतून पिण्याचे, वापराचे, जनावरांना लागणारे, व शेतीसाठीचे पाणी तर मिळालेच आहे. पण शिल्लक पाण्यातून लाखो रुपयांचे चलनही पानवडीला मिळणार आहे. जलसंपदेकडून धनसंपदेकडे जाणारा हा प्रवास म्हणूनच पानवडीच्या विकासाचा मार्ग ठरणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com