गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सरकारचा संकल्प; आतापर्यंत 127 शहरे निर्मल
मुंबई - स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत राज्यातील 127 शहरे हागणदारीमुक्त करण्यात आली असून, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर यंदा 250 गावे हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प राज्य सरकारने केला असल्याची माहिती नगर विकास विभागातून देण्यात आली.
नागरी भागात आतापर्यंत तीन लाख 12 हजार 825 शौचालयांचे बांधकाम पूर्ण झाले आहे, तर एक लाख 53 हजार 510 शौचालयांचे बांधकाम प्रगतिपथावर आहे. हागणदारीमुक्त झालेल्या शहरांमध्ये सर्वाधिक पुणे जिल्ह्यातील 13 शहरांचा समावेश आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर नगर, कोल्हापूर, नागपूर या जिल्ह्यांतील प्रत्येकी 10 शहरे आहेत. तर तिसऱ्या क्रमांकावर सिंधुदुर्ग व सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येकी आठ शहरांचा समावेश आहे.
केंद्र सरकारचे अभियान 2 ऑक्टोबर 2019 पर्यंत सुरू राहणार असले तरी राज्यातील सर्व नागरी भाग 2 ऑक्टोबर 2017 पर्यंत हागणदारीमुक्त करण्याचा निर्धार राज्याने केला आहे. या अभियानाची फलश्रुती म्हणजे हागणदारीमुक्त शहरांच्या तपासणीसाठी केंद्राने नियुक्त केलेल्या त्रयस्थ संस्थेमार्फत करण्यात आलेल्या तपासणीत देशातील दहा शहरांमध्ये राज्यातील पाचगणी, कागल, मुरुगुड, पन्हाळा व वेंगुर्ला या शहरांचा समावेश आहे. राज्यात 2011 च्या जनगणनेनुसार उघड्यावर शौचास जाणाऱ्या कुटुंबांची संख्या 8 लाख 32 हजार 672 आहे. त्यापैकी शौचालयाच्या मागणीसाठी 7 लाख 60 हजार 308 कुटुंबांचे अर्ज आले आहेत. त्यापैकी 5 लाख 27 हजार 808 कुटुंबांचे अर्ज तपासण्यात आले आहेत, तर 4 लाख 46 हजार 521 कुटुंबांना शौचालय मंजूर करण्यात आले आहे. त्यापैकी 3 लाख 12 हजार 825 शौचालयांचे बांधकाम पूर्ण झाले असून, 1 लाख 53 हजार 510 शौचालयांचे बांधकाम प्रगतिपथावर आहे. यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत प्रतिशौचालय 12 हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे.
स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या अंमलबजावणीसाठी स्वच्छतेच्या सप्तपदीमधील पहिले पाऊलमध्ये महाड, माथेरान, रोहा, चिपळूण, खेड, दापोली, गुहागर, वेंगुर्ला, मोवाड, भगूर, मलकापूर, पन्हाळा, सातारा, महाबळेश्वर, पाचगणी, वाई, मलकापूर, करमाळा, कुर्डुवाडी ही नगरपालिका व नगर परिषदेची 19 शहरे 2 ऑक्टोबर 2015 रोजी हागणदारीमुक्त झाली आहेत.
स्वच्छतेच्या सप्तपदीमधील दुसरे पाऊलमध्ये 26 जानेवारी 2016 पर्यंत चिखलदरा, कर्जत, मुरुड जंजिरा, पेण, राजापूर, मालवण, उमरेड, काटोल, मोहपा, रामटेक, महादूला, शिर्डी, शिरपूर-वरवाडे, फैजपूर, त्रिंबक, जयसिंगपूर, गडहिंगल्ज, कागल, कुरुंदवाड, मुरगूड, वडगाव कसबा, तळेगाव दाभाडे, इंदापूर, जेजुरी, सासवड, शिरूर, रहिमतपूर, दुधनी, मैंदर्गी, मंगळवेढे, सांगोले ही नगरपालिका व नगर परिषदेची 31 शहरे, तर कोल्हापूर महानगरपालिका अशी एकूण 32 शहरे हागणदारीमुक्त झाली आहेत. संपूर्ण हागणदारीमुक्त होणारी कोल्हापूर महानगरपालिका ही राज्यातील पहिली महानगरपालिका ठरली आहे.
सप्तपदीच्या तिसरे पाऊलमध्ये पेठ उमरी, पाथरी, खोपोली, देवरुख, लांजा, सावंतवाडी, देवगड-जामसंडे, कुडाळ, वाभवे-वैभववाडी, कणकवली, भंडारा, तुमसर, पवनी, कळमेश्वर, खापा, नरखेड, मैंदा, देवळी, पुलगाव, संगमनेर, देवळाली प्रवरा, नंदूरबार, सटाणा, येवला, बारामती, दौंड, लोणावळा, आळंदी, भोर, जुन्नर, राजगुरुनगर, उरण इस्लामपूर, विटा, आष्टा, तासगाव, पंढरपूर ही 36 शहरे 2 ऑक्टोबर 2016 पर्यंत हागणदारीमुक्त झाली आहेत. त्याचबरोबर 2 ऑक्टोबर 2016 नंतर बदलापूर, बल्लारपूर, कोपरगाव, शेंदूरजना, खुलताबाद, पाथर्डी, रावेर, सावदा, जामनेर, कसाई-दोडामार्ग, बार्शी, रिसोड, मंगळूरपीर, जव्हार, श्रीगोंदा, भूम, अंबरनाथ, सिल्लोड, श्रीरामपूर, उमरगा, कन्नड, गेवराई, कळमनुरी, बिलोली, कंधार, मुदखेड, हादगांव, राहुरी, राहता पिंपळस, शिराळा, माहूर, इचलकरंजी ही नगरपालिका व नगर परिषदेची 32 शहरे तर नवी मुंबई, चंद्रपूर, धुळे, पुणे, नाशिक, सांगली, वसई-विरार आणि अहमदनगर ही महानगरपालिकेची आठ शहरे हागणदारीमुक्त करण्यात आली आहेत.
|