मुंबई - मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील शिवसेना आणि भाजप यांच्यातील जागावाटपाला मकर संक्रांतीनंतर मुहूर्त मिळाला आहे. दोन्ही पक्षांनी स्वबळाची तयारी केली असली तरीही, मुंबई आणि ठाणे महानगरपालिकांसाठी दोन्ही पक्षांच्या वतीने युती आणि जागावाटप यावर येत्या रविवारी (ता. 15) प्राथमिक चर्चा होणार असल्याचे सूत्रांकडून समजते.
विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेची युती तुटल्यानंतर दोन्ही पक्षांकडून त्यानंतर झालेल्या बहुतांश निवडणुकांत स्वबळाची भाषा आक्रमकपणे वापरली गेली. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत तर दोन्ही पक्षांनी कहर केला होता. मात्र, निवडणुकीनंतर सध्या शिवसेना आणि भाजप तेथे सत्तेत आहेत. मुंबई महानगरपालिकेत कोणत्याही परिस्थितीत "कमळ' फुलवण्याची इच्छा असली तरीही शिवसेनेच्या कडव्या आव्हानाचा सामना करताना हे सहजसाध्य अथवा सोपे नाही, याची जाणीव भाजपला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे युतीसाठी आग्रही असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे येत्या रविवारपासून युतीच्या दोन्ही बाजूंकडील नेत्यांची चर्चा सुरू होईल. युतीसंदर्भात भाजपकडून शिवसेनेला युती करण्याचा प्रस्ताव देण्यात आल्याचे सांगितले जाते. मुंबईबाबत चर्चेसाठी भाजपकडून मंत्री विनोद तावडे, प्रकाश महेता, आमदार आशिष शेलार आदी, तर शिवसेनेकडून मंत्री सुभाष देसाई, खासदार अनिल देसाई, आमदार ऍड. अनिल परब आदी राहणार आहेत. मुंबई महापालिकेसाठी आमदारांच्या संख्याबळाच्या आधारे भाजप जागा मागत आहे. मात्र, शिवसेना त्यानुसार जागावाटपास राजी होणार नसल्याचे समजते. मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना 85 ते 90 जागा भाजपच्या वाट्याला सोडण्याची शक्यता आहे.
|