अंबासन - सततची नापिकी, कर्ज आणि त्यातच बियाणे घेण्यासाठीही पैसे नसल्याच्या नैराश्यातून गुरुवारी आखतवाडे (ता. बागलाण) येथील तरुण शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. शेतकऱ्यांना कर्जमाफीची व्याप्ती वाढवल्यानंतरही जिल्ह्यात आत्महत्यांचे सत्र सुरूच असल्याचेच या घटनेमुळे स्पष्ट झाले आहे.
किशोर बापू खैरनार (वय 34) असे या तरुण शेतकऱ्याचे नाव असून, त्याने बिजोटे शिवारातील स्वतःच्या शेतात असलेल्या विहिरीत उडी घेऊन जीवनयात्रा संपवली. गेल्या चार दिवसांत तालुक्यातील ही दुसरी घटना आहे. लहानपणीच वडिलांचे छत्र हरपलेल्या किशोरवर आई, दोन बहिणी आणि लहान भाऊ यांचा सांभाळ करण्याची जबाबदारी होती. त्याने शेतीसाठी हातउसनवार व बॅंकेकडून सुमारे तीन लाखांचे कर्ज घेतले असल्याचे नातेवाइकांनी सांगितले. सध्या पेरणीचे दिवस असल्याने बाहेरून पैसे उचल करून बियाणे घेऊन येतो, असे सांगत किशोर घराबाहेर पडला होता. मात्र, तीन दिवस उलटूनही तो घरी न परतल्याने नातेवाइकांनी शोध घेतला. शोध सुरू असतानाच त्याने शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे आज सकाळी निदर्शनास आले.
|