मुंबई - लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या चिरागनगर येथील आंतरराष्ट्रीय स्मारकाचा आराखडा येत्या दोन महिन्यांत सरकारला प्राप्त होईल. त्यानुसार नियोजित खर्चाचा अंदाज घेऊन या स्मारकाच्या उभारणीची घोषणा करण्यात येईल, अशी माहिती सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी बुधवारी दिली.
साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक व्हावे, ही अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. त्यासाठी राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली सरकारने समिती स्थापन केली आहे. या समितीची बैठक बुधवारी मंत्रालयात झाली. चिरागनगर येथे प्रस्तावित जागेवर 700 घरे आहेत. या घरांचे पुनर्वसन करण्यासाठी काही विकसकांनी प्रस्ताव दिले आहेत. त्या विकसकांसोबत 23 मे रोजी बैठक होणार असल्याचे कांबळे यांनी सांगितले.
या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकात डिजिटल लायब्ररी, अभ्यास केंद्र, शाहिरी कला शिकवणारे केंद्र, सभागृह, अण्णा भाऊंच्या विचारांचा प्रचार-प्रसार, त्यांचे समग्र साहित्य आदी ठेवले जाणार आहे. या स्मारकासंदर्भात प्राथमिक स्तरावर चर्चा सुरू असून, दोन महिन्यांत आराखडा दिला जाईल, असेही कांबळे यांनी सांगितले.
|