मुंबई - गेल्या तीन वर्षांपासून बंदी घालण्यात आलेल्या राज्यातील बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू करण्याची मागणी विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी केली आहे. यासाठी बैलगाडा संघटनेच्या शिष्टमंडळासह वळसे पाटील यांनी पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
मार्च- एप्रिल महिन्यांत गावोगावी ग्रामदैवतांचा यात्रोत्सव असल्याने चालू अधिवेशनातच बैलगाडा शर्यतीचे विधेयक मंजूर करण्याचा आग्रह या निवेदनातून करण्यात आला आहे. याची दखल घेत लवकरच हे विधेयक मांडले जाईल, असे जानकर यांनी सूचित केले.
बैलगाडा शर्यतीवर बंदी आल्याने ग्रामीण भागातील यात्रा- उत्सवांवर परिणाम झाला आहे. देशी जनावरांच्या संगोपनावर परिणाम होऊन बैलांची संख्या कमी झाली असल्याची बाब या शिष्टमंडळाने जानकर यांच्या निदर्शनास आणून दिली. तसेच, ही शर्यत सुरू करण्याचे आश्वासन खुद्द मुख्यमंत्र्यांनी विविध संघटनांना दिल्याची आठवणही वळसे-पाटील यांनी करून दिली. या बैठकीला पशुसंवर्धन विभागाचे उपसचिव शशांक साठे, पशुसंवर्धन विभागातील वरिष्ठ अधिकारी, अखिल भारतीय संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब आरुडे आदी उपस्थित होते.
|