मुंबई - विधिमंडळाच्या अर्थसंकल्पी अधिवेशनात बैलगाडा शर्यतीसंदभातील विधेयक मांडण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत जाहीर केले. विधिमंडळाचे अर्थसंकल्पी अधिवेशन येत्या सहा मार्चपासून सुरू होणार असून, सात एप्रिल 2017 पर्यंत ते चालणार आहे. ता. 18 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर करण्यात येणार असल्याचे आज झालेल्या विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत ठरविण्यात आले.
बैलगाडा शर्यतीसंदर्भात शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांनी फडणवीस यांच्याकडे मागणी केली होती. यावर फडणवीस यांनी या अधिवेशनात याबाबतचे विधेयक आणणार असून तशा प्रकारचे आदेश त्यांनी विधी व न्याय विभागाला दिल्याचे पाटील यांनी सांगितले. यामुळे राज्यात बैलगाडा शर्यतीचा फड लवकरच रंगणार असल्याची चिन्हे आहेत.
राज्यात सध्या बैलगाडा शर्यतीवर बंदी आहे. ही बंदी उठवण्यासाठी राजकीय नेत्यांकडून वारंवार मागणी होत आहे. अलीकडेच तमिळनाडूतील जलिकट्टू या साहसी खेळावरील बंदी उठवण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातही बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्याची मागणीला बळ मिळत गेले. त्यातच शेकापचे आमदार जयंत पाटील, शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील आदींनी ही मागणी सातत्याने लावून धरली होती.
अधिवेशनाबाबत बैठक
विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक आज विधानभवनात झाली. या वेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, उपसभापती माणिकराव ठाकरे, विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधिमंडळ कामकाजमंत्री गिरीश बापट, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, विधिमंडळ कार्य राज्यमंत्री विजय शिवतारे, रणजित पाटील, विधान परिषद सदस्य सुनील तटकरे, शरद रणपिसे, संजय दत्त, सतीश चव्हाण, विजय ऊर्फ भाई गिरकर, विधानसभा सदस्य गणपतराव देशमुख, जयंत पाटील, राज पुरोहित आदी उपस्थित होते. विधिमंडळाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे यांनी कामकाजासंबंधी माहिती दिली.
या अधिवेशनात प्रलंबित दोन विधेयके, सहा अध्यादेश मांडण्यात येणार आहेत. यामध्ये मुंबई महापालिका (सुधारणा) अध्यादेश 2017, (बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्याच्या प्रयोजनासाठी महापालिकेची जागा देता यावी, यासाठी तरतूद), महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (सुधारणा) अध्यादेश, 2017 (अंतिम विकास आराखड्यामध्ये व प्रारूप विकास आराखड्यामध्ये दर्शविलेल्या जमिनीच्या वापरानुसार जमीन महसूलसंहिता यामधील जमीनवापराचे रूपांतरण करण्याबाबतच्या तरतुदीत सुधारणा, मुंबई महापालिका आणि महाराष्ट्र महापालिका (सुधारणा) अध्यादेश, 2017 (अनधिकृत इमारतींवर बसविण्यात येणाऱ्या शास्तीच्या रकमेत सुधारणा करण्यासाठी अशी शास्ती मालमत्ताकराच्या दुपटीपेक्षा महापालिका ठरवेल अशी असेल, अशी तरतूद करणे), महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग (सुधारणा) अध्यादेश (राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्य संख्येमध्ये सहावरून आठ एवढी वाढ करणे), महाराष्ट्र ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती (सुधारणा) अध्यादेश, 2017 (ग्रामपंचायत व जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना शौचालय वापराचे स्वयंप्रमाणपत्र देण्याबाबत तरतुदी) आणि मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र महापालिका आणि महाराष्ट्र नगर परिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा) अध्यादेश, 2017 (महापालिका व नगर परिषदा यांच्या निवडणुका लढविणाऱ्या उमेदवारांना शौचालय वापराचे स्वयंप्रमाणपत्र देण्याबाबत तरतुदी) ही विधेयके मांडण्यात येणार आहेत, असेही बापट यांनी या वेळी सांगितले.
कामकाज 23 दिवस
अर्थसंकल्पी अधिवेशनात 23 दिवस कामकाज चालणार आहे. राज्याचा अर्थसंकल्प 18 मार्चला दुपारी दोन वाजता सादर करण्यात येणार आहे. माजी संरक्षणमंत्री शरद पवार आणि ज्येष्ठ विधिमंडळ सदस्य गणपतराव देशमुख यांच्या संसदीय कारकिर्दीस पन्नास वर्षे पूर्ण झाल्याबद्दल 24 मार्च रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत त्यांच्या अभिनंदनपर ठरावावर चर्चा होणार आहे, अशी माहिती गिरीश बापट यांनी बैठकीनंतर दिली.
|