निम्म्या जागांसाठी भाजपचा आग्रह; शिवसेनेचे मुख्यमंत्र्यांकडे लक्ष
मुंबई - मुंबईमध्ये सर्वाधिक कमळे फुलावित, ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सर्वोच्च प्राथमिकता असल्याने सम-समान जागावाटपाच्या प्रस्तावावर कुठलीही तडजोड करणार नाहीत असे दिसते. विश्वसनीय सूत्रानुसार, भाजपसाठी 110 जागा हा मुख्यमंत्र्यांचा शेवटचा आकडा असेल; पण मान्य न झाल्यास कुठलीही कटुता मनात न ठेवता स्वबळावर लढूया, असे फडणवीस हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कळवण्याची शक्यता आहे.
मुंबई महापालिकेत सर्वाधिक कमळे फुलवणे, हे फडणवीस यांचे ध्येय आहे. त्यासाठी शिवसेनेने 110 ते 115 जागा द्याव्यात, असा त्यांचा आग्रह असेल. भाजपसाठी सर्वेक्षणाचे काम करणाऱ्या संस्थांनी नरेंद्र मोदीप्रणीत विकासाचे देवेंद्र फडणवीससंचालित मॉडेल महाराष्ट्रातील मुंबईसह सर्व शहरवासीयांना हवेसे वाटत असल्याचा अहवाल सादर केला आहे. त्यामुळे शिवसेनेशी सौख्य सांभाळणारे फडणवीसही निम्म्या जागांच्या मागणीवर ठाम राहणार असल्याचे समजते. वस्तुस्थिती लक्षात घेत जागांची निम्मी-निम्मी वाटणी मान्य करा, असा निरोप ते लवकरच उद्धव ठाकरे यांना पाठवण्याची शक्यता आहे. नगरपालिका निवडणुकांतील यशानंतर केंद्रीय भाजपने युतीचा निर्णय फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यावर सोपवला आहे. मुंबईच्या रिंगणात स्वबळावर उतरण्याचा निर्णय घेतला, तरी भाजपला सर्वाधिक जागा मिळतील, असे भाकीत पाहणीच्या आधारावर केले जात आहे. पालकमंत्री विनोद तावडे, मुंबई अध्यक्ष आशीष शेलार निम्म्या जागांचा आग्रह धरत आहेत. युतीसंदर्भातील अंतिम निर्णय मुख्यमंत्रीच घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
राज्यात सर्वत्र युतीची चर्चा ठप्प
दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी परस्परांवर दाखवलेल्या अविश्वासानंतर मुंबई, पुणे, नाशिक या सर्व ठिकाणच्या जागांच्या देवाणघेवाणची चर्चा थांबली आहे. मुख्यमंत्र्यांनीच आता भूमिका स्पष्ट करावी, असे म्हणत शुक्रवारी शिवसेनेने कोणतीही चर्चा केली नाही.
|