राज्यातील विमानसेवेचा चेंडू केंद्राच्या हातात

राज्यातील विमानसेवेचा चेंडू केंद्राच्या हातात

विविध ठिकाणी विमानसेवेला संधी असतानाही करावी लागते प्रतीक्षा

मुंबई - राज्यात अनेक शहरांत असलेल्या विमानतळावरून अंतर्गत विमानसेवा सुरू होण्याची परिस्थिती आहे. तरीही प्रवासी विमान वाहतूक सेवा देणाऱ्या कंपन्यांना केंद्र व राज्य सरकारने कोणत्याही पद्धतीने अकृषित केले नाही. त्यामुळे शिर्डी, नाशिक, पुणे, कोल्हापूर आदी शहरांतून अद्याप नियमित विमानसेवेला प्रारंभ झाला नाही. सुमारे 80 टक्‍के इतके अनुदान देणाऱ्या केंद्राच्या हातात राज्यातील विमानसेवेचा चेंडू आहे.

देशाअंतर्गत विमानसेवेला चालना मिळावी, यासाठी केंद्र सरकारने अलीकडेच विमान सेवा धोरण जाहीर केले. या धोरणात प्रवासी विमान वाहतूक सेवा देणाऱ्या खासगी कंपन्यांना काही सवलती देण्याची तरतूद केली. तसेच प्रवाशांनाही तिकीट दर परवडणारा असावा, असे ठरवण्यात आले असून अडीच हजार रुपये इतके तिकीट शुल्क ठेवण्यात आले आहे. विमानसेवा देणाऱ्या खासगी कंपन्यांना आर्थिकदृष्ट्या परवडण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार अनुदानापोटी रक्‍कम देणार आहे. यामध्ये केंद्र 80 टक्‍के तर, राज्य 20 टक्‍के इतका आर्थिक भार उचलणार आहे. असे असले तरीही केंद्र सरकारकडून अद्याप काही हालचाली झालेल्या नाहीत. त्यामुळे अनेक शहरांतील विमानतळ विमानसेवा देण्यासाठी सज्ज असूनही विमानसेवा सुरू झाली नाही.

राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद वगळता इतर विमानतळांचे कामकाज महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी पाहते. राज्य सरकार, भारतीय विमानतळ प्राधिकरण यांच्या मदतीने ही कंपनी विमानतळ, विमानसेवा याबाबतच्या काही अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करते. राज्यात 25 ते 50 आसनी विमानसेवा सुरू करण्यासाठी लागणारे आवश्‍यक प्रवासी नक्‍कीच मोठ्या प्रमाणावर मिळणार आहेत. धार्मिक, पर्यटन, आर्थिक, सांस्कृतिक ठिकाणी असलेली शहरे अशा सेवेने जोडल्यावर याचा नक्‍कीच लाभ होणार असून पर्यटनात वाढ होणार आहे.

शिर्डी, अमरावती, गोंदिया, नाशिक, जळगाव, नांदेड, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे विमानतळ राज्य सरकारने निश्‍चित केले आहेत. यामध्ये शिर्डी विमानतळावरून विमानसेवा नोव्हेंबर महिन्यातच सुरू होणार होती. मात्र ती आता जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सुरू होण्याची शक्‍यता आहे. कोल्हापूर विमानतळासाठी राज्य सरकारने जागा उपलब्ध करून दिली आहे. मात्र केंद्र सरकारचा 30 टक्‍के इतका निधी येणे आहे. येथूनही विमानसेवा सुरू करता येते. सोलापूरमध्ये होटगी येथे विमानतळ आहे. तेथील साखर कारखान्याची चिमणी अडथळा ठरत आहे.

त्यामुळे ते सुरू होण्यास विलंब लाणार आहे. नाशिक येथून विमानसेवा सुरू होऊ शकते. अमरावती येथे पुरेशी जमीन संपादित झाली नाही. ती करण्याचे काम सुरू आहे. गोंदिया येथे जागा मिळाली आहे. सर्व्हेक्षण सुरू आहे. जळगाव, रत्नागिरी येथील विमानतळ तयार आहे. सिंधुदुर्गमधील चीपी येथील विमानतळाचा विकास सुरू आहे. नांदेड येथेही विमानसेवा सुरू करता येते. पुणे येथील पुरंदर येथे नुकतीच घोषणा झाली असून जमीन संपादण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com