"स्वच्छता' मानांकनासाठी राज्यातील सर्वांधिक शहरे 

swachh
swachh

मुंबई - "स्वच्छता अभियानात' पात्र ठरून देशपातळीवरील मानांकन स्पर्धेत यशस्वी लढा देण्यासाठी राज्यातील सर्वांधिक 44 शहरे पात्र ठरली आहेत. राज्यातील शहरांचा हा आकडा यंदा प्राथमिक निकष पात्र ठरलेल्या देशातील 500 शहरांमध्ये सर्वांधिक असून, महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक लागला आहे. मागील वर्षी देशभरातील 73 शहरांमध्ये राज्यातील 9 शहरांचा समावेश होता. 

"स्वच्छ भारत अभियानांतर्गत' दरवर्षी देशातील शहरांची निकष लावून निवड केली जाते. यानंतर केंद्रीय नगरविकास विभागाची पथके एका ठराविक काळात प्रत्येक शहरांना भेट देऊन स्वच्छतेची पाहणी करताना प्रत्येक शहरांना मानाकन देतात. यासाठी दोन हजार गुणांच्या परीक्षेला प्रत्येक शहराला सामोरे जावे लागते. यापैकी 1200 गुण हे घनकचरा व्यवस्थापन, हागणदारीमुक्‍त शहर यासाठी, तर उरलेले 800 गुण शहर, प्रशासन कागदपत्रे आदींविषयी आहेत. घनकचरा व्यवस्थापनामध्ये प्रकल्प, त्याची अंमलबजावणी, त्यातील कल्पकता, पर्यावरण, नावीन्यपूर्ण बाबी असे अनेक घटक विचारात घेतले जातात. तर हागणदारीमुक्‍त शहर यात शौचालये, स्वच्छता, आरोग्य आदी घटकांचा विचार करून हे गुण दिले जातात. ज्या शहराला जास्तीत जास्त गुण त्या शहराचे मानांकन सगळ्यात वरचे राहणार आहे. यामध्ये देशातील सर्वांधिक स्वच्छतेचे पहिल्या मानांकनाचे शहर ते अगदी तळाच्या म्हणजे 500 व्या स्थानावर स्थानावर असलेले शहर असे मानांकन राहणार आहे. 

राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने "स्वच्छता अभियान' राबविताना यंदा राज्यातील जास्तीत जास्त शहरांचा देशपातळीवर नामांकनासाठी विचार व्हावा, या दृष्टिकोनातून गेल्या आठ महिन्यांपासून काम केले. त्यानुसार घनकचरा व्यवस्थापन, त्यातील गती, हागणदारीमुक्‍तीच्या दिशेने योग्य कार्यवाही, यासाठी प्रयत्न सुरू ठेवले होते. यासाठी जागतिक स्तरावरील जाणकारांच्या कार्यशाळा, शहरपातळीवरील नगरविकास विभागाच्या अधिकारी-कर्मचारी यांना "उद्दिष्ट पूर्तीचे' लक्ष्य दिले. त्यानुसार अंमलबजावणी केल्यामुळे 44 शहरे प्राथमिक निवडीचे निकष पार करू शकली. 

केंद्रीय पथके 4 जानेवारी ते 4 फेब्रुवारी 2017 या कालावधीत या शहरांची पाहणी करून मानांकन करणार आहेत. यानंतर 15 फेब्रुवारीच्या दरम्यान देशातील 500 शहरांचे मानांकन जाहीर केले जाणार आहे. 

मानांकनाच्या शर्यतीतील शहरे 
बृहन्मुंबई, पालघर, अंबरनाथ, बदलापूर, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, ठाणे, उल्हासनगर, रायगड, पुणे, पिंपरी-चिंचवड, सातारा, कोल्हापूर, इचलकरंजी, सोलापूर, बार्शी, उस्मानाबाद, लातूर, उदगीर, नांदेड-वाघाळा, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, हिंगणघाट, गोंदिया, नागपूर, अमरावती, अचलपूर, अकोला, जालना, परभणी, बीड, नगर, शिर्डी, औरंगाबाद, जळगाव, भुसावळ, धुळे, नंदूरबार, नाशिक, मालेगाव, सांगली, नवी मुंबई. 

मुंबई, पुणे, नागपूर 
गेल्या वर्षी राज्यातील मुंबई शहर देशपातळीवर मानांकनात 10व्या स्थानी होते. त्यानंतर पुणे (11), नवी मुंबई (12), ठाणे (17), नागपूर (20) यांची मानांकने होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही शहरे किती प्रगती करतील याची उत्सुकता आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com