'ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र'मध्ये विद्यार्थ्यांच्या सरस कल्पना 

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis

मुंबई : 'ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र' कार्यक्रमात आज (सोमवार) राज्यातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी दुष्काळमुक्त महाराष्ट्र, वाहतूक व्यवस्थेचे एकात्मिकरण, नागरिकांचा प्रशासनातील सहभाग, घनकचरा व्यवस्थापन एकूण अकरा विषयांवर सादरीकरण केले. या सादरीकरणातील सूचनांचा उपयोग राज्य शासन आपल्या विविध योजनात करणार असल्याचे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

वरळी येथील एनएससीआयच्या आवारात 'ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र' अंतर्गत 'अँक्‍शन फॉर कलेक्‍टिव्ह ट्रान्फॉर्मेशन' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सुमारे सहा हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी 'व्हिजन महाराष्ट्र 2025' या विषयावर संवाद साधला. 

'ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र'ची सुरवात करताना एक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये विविध महाविद्यालयांच्या अकरा संघांची अंतिम फेरीत निवड झाली होती. या अकरा संघांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतर मान्यवरांच्या समोर आपल्या उपाय योजनांचे सादरीकरण केले. यावेळी अभिनेता अक्षय कुमार उपस्थित होते. या स्पर्धेतील विजेत्यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांनी दुष्काळमुक्त महाराष्ट्र विषयावर केलेल्या सादरीकरणावर मुख्यमंत्री म्हणाले की, या विद्यार्थ्यांनी सादर केलेले एसडीएसएस हे मॉडेल उत्तम असून जलयुक्त शिवार योजनेत समाविष्ट करण्यात येईल. त्यामुळे जलयुक्त शिवार योजनला खूप मोठा फायदा होईल. नागरी गरिबी निर्मूलन विषयावरील सादरीकरणामध्ये स्मार्ट सिटीसाठी उपयुक्त उपाय योजना आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी वसंतदादा पाटील वास्तुशास्त्र महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या सादरीकरणावर सांगितले. 

कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणेच्या विद्यार्थ्यांनी एकात्मिक वाहतूक यंत्रणेवरील सादरीकरण केले; तर व्हिजेआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांच्या भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र विषयावर मुख्यमंत्री म्हणाले की, भ्रष्टाचार कमी करण्यासाठी राज्य शासनाने सेवा हमी कायदा आणला आहे. यात 370 सेवा या ऑनलाईन देण्यात आल्या आहेत. या कायद्यानुसार प्रत्येक विभागाला ठरविलेल्या कालावधीत, ठरविलेल्या शुल्कामध्ये सेवा देणे बंधनकारक असल्याचे ते म्हणाले. 

अवसारीच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय व संशोधन संस्थेच्या 'टीम नन्ही आशा' ने ग्रामीण महाराष्ट्रातील शिक्षणाचा कायापालट करण्यासाठी उपाय योजना सुचविल्या. व्हीजेटीआय मुंबईच्या विद्यार्थ्यांनी स्टार्टअप इंडियावर सादरीकरण केले. यामध्ये स्टार्टअप मार्गदर्शन सेंटर व वेबसाईटची कल्पना सुचविली. याशिवाय स्वच्छ महाराष्ट्र, न्यायव्यवस्थेत तंत्रज्ञानचा वापर, ग्रामीण भागात डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर आदी विषयांवरही विद्यार्थ्यांनी सादरीकरण दिले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com