मुंबई - एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बॅंकेच्या (Asian Infrastructure Investment Bank-AIIB) ंमुंबईत होणाऱ्या तिसऱ्या वार्षिक सभेच्या निमित्ताने महाराष्ट्रासह देशात विकासाच्या नवीन संधी निर्माण होतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
एआयआयबीची तिसरी वार्षिक सर्वसाधारण सभा 25 व 26 जूनला मुंबईत होत आहे. या सभेचे यजमानपद भारताने स्वीकारले आहे. यानिमित्त आयोजित परिषदेत आशिया खंडातील विविध देशांचे शासकीय, खासगी तसेच सार्वजनकि संस्थांमधील प्रतिनिधी यांच्यासह नागरी संघटनांचे प्रतिनिधीदेखील सहभागी होणार आहेत. "पायाभूत सुविधांसाठी वित्तीय पुरवठा : नावीन्यता आणि सहकार्य' या संकल्पनेवर आधारित या परषिदेमध्ये सर्व प्रतिनिधी आपल्या नावीण्यपूर्ण संकल्पना आणि अनुभवांची देवाण-घेवाण करतील. त्या माध्यमातून शाश्वत विकासासाठी भविष्यात आवश्यक असलेल्या गुंतवणुकीवर विचारविनिमय होणार आहे.
एआयआयबीमध्ये भारत दुसऱ्या क्रमांकाचा भागधारक आहे. सुमारे 100 बिलियन डॉलर्सचे भागभांडवल असलेली ही बॅंक एक ते दीड टक्के व्याजदराने दीर्घ मुदतीचे कर्ज देते. भारतातील मानव विकास निर्देशांक मोठ्या प्रमाणावर उंचावण्यासाठी सहायक ठरू शकणाऱ्या देशातील पायाभूत विकास प्रकल्पांना बॅंकेमार्फत चालना दिली जाणार आहे.
भारतातील 1.2 बिलियन डॉलर्स किमतीच्या पायाभूत विकासाच्या सहा कामांसाठी एआयआयबीने कर्ज मंजूर केले आहे; तसेच 1.9 बिलियन डॉलर्स किमतीचे आणखी काही प्रकल्प बॅंकेच्या विचाराधीन आहेत.
|