'कालेधन वालोंका मुह काला'- देवेंद्र फडणवीस

devendra fadnavis statement on black money
devendra fadnavis statement on black money

नागरिकांना पॅनीक न होण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

औरंगाबाद-
देशातील पाचशे व एक हजार रुपयांच्या चलनी नोटा बंद करायचा निर्णय घेतल्याने लोकांनी घाबरून जाऊ नये. पॅनीक व्हायची गरज नाही. चिंता काळा पैसा ज्यांच्याकडे आहे त्यांनी करावी. असे सांगताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "मेहनत की कमाई करणे वालोका बोलबाला होगा और कालेधन वालोंका मुह काला होगा' अशा शेरही पत्रकार परिषदेत ऐकविला.

औरंगाबादेत डीएमआयसीअंतर्गत आयोजित कार्यक्रमानंतर त्यांनी आज (बुधवार) प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयाविषयी बोलताना ते म्हणाले की, "प्रधानमंत्री यांनी काळ्या पैशाविरोधात आणि भ्रष्टाचाराच्याविरोधात निर्णायक भूमिका जाहीर केली. यामुळे देशातील काळ्या पैश्‍यावर मोठ्याप्रमाणावर निर्बंध येणार आहे. भ्रष्टाचाराने कमाविलेल्या पैश्‍यावर निर्बंध येणार आहे. या निर्णयाने सामान्य, गरीब, मध्यमवर्गीयांना मोठा फायदा मिळेल. नागरीकांना एकच विनंती आहे, त्यांनी घाबरण्याची आवश्‍यकता नाही. पॅनीक होऊ नये. नागरीकांचा कायदेशीररित्या कमाविलेला जो सगळा पैसा आहे तो सुरक्षीत आहे. दोन दिवस केवळ बॅंका बंद असतील. मात्र, त्यानंतर बॅंकेत जाऊन आपल्याकडे ज्या पाचशे हजाराच्या नोटा आहेत, ज्या प्रामाणिकपणे कमाविलेल्या आहेत, त्या बॅंकेत जमा करता येतील. वेगळ्या नोटा घेता येतील. सोबतच कुठलेही व्यवहार बंद करण्यात आलेले नाही. चेकच्या माध्यमातून तुम्ही कितीही पैशाचे व्यवहार करू शकतात. क्रेडीट कार्ड, डेबीट कार्डने व्यवहार करता येईल. त्यामुळे व्यवहार बंद होतील, अशा प्रकारची जी भिती आहे, ती अनाठायी भिती आहे.'

"आज अनेक लोक चितेंत आहे. विशेषतः शेतकऱ्यांनी त्यांचा माल विकलेल्या असल्याने त्यांच्याकडे रोख पैसा आलेला आहे. आमच्या नोटा आता वाया जाणार आहेत का? असा प्रश्‍न पडला आहे. त्यांनासुध्दा सांगतो, तुमचा पैसा वाया जाणार नाही. आपल्याकडील नोटा उद्या बॅंका उघडल्याकी त्यात जाऊन जमा करा. तुमचा पैसा सर्व अधिकृत होईल. तुमचा पैसा तुमच्याजवळच राहील. केवळ आता चिंता त्यांनीच करायची आहे, ज्यांच्याजवळ काळा पैसा आहे. ज्यांनी गैरमार्गाने पैसा कमाविलेला आहे, त्यांनी मात्र चिंताग्रस्त होण्याची गरज आहे. एटीएम बंद असल्याने तो पैसा बदलला जाईल. नवीन चलन देखील लोकांना उपलब्ध होईल. म्हणून मला वाटत, रांगा लावण्याची आवश्‍यकता नाही. टोलवर अडचणी येत आहेत. त्यांना तत्काळ सुचना देण्यात आल्या असून लोकांची अडवणूक होणार नाही याचा प्रयत्न सुरू आहे.' असे श्री. फडणवीस म्हणाले.

ते पुढे म्हणाले, "देशाच्या अर्थव्यवस्थेला लागलेला कॅन्सर हा काळ्या पैश्‍याचा आहे. हा काळा पैसा आमचा संपला आणि अर्थव्यवस्थेत परत आला तर देशाची प्रगती चारपटीने अधिक होईल. अंत्यत चांगला व योग्य निर्णय आहे. दुसरा फायदा असाही आहे की, सातत्याने आपल्याकडे माहिती येत असते कि नकली नोटा बाजारपेठेत टाकण्याचा प्रयत्न होत असतो. तोही संपणार आहे. बाजारात अशा नकली नोटा असतील तर त्या आता संपणार आहे. नवीन नोटांची नकली नोट तयार करता येणार नाही. बॅंकेत आपल्याकडचे पैसा जमा करा. पैसा जमा करण्यावर कुठलीही मर्यादा नाही. अर्थात काळा पैसा असेल तर बॅंका विचारतीलच. कमाईचा पैसा कितीही जमा करता येईल. काळा पैसा रोखण्यासाठी लोकांनी जास्तीत जास्त व्यवहार चेकनी केला पाहीजे. त्यावर कुठलीही बंधने नाहीत.'

"कालरात्री हा निर्णय जाहीर झाल्यावर राज्याचे डीजीपी. वित्त सचिव व संबधित अशा सर्वांची मी बैठक घेतली. काय काय अडचणी समोर येऊ शकतात, त्याचे आकलन केले. त्याच्यावरची स्ट्रॅटजी तयार करून लोकांना कामी लावले आहे. बॅंकांचा व्यवहार परवापासून नीट सुरू झाल्यानंतर यातील नव्वद टक्के अडचणी दुर होतील.' असे त्यांनी सांगीतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com