राजकीय इच्छाशक्तीतूनच शिक्षण व्यवस्थेचा विकास - प्रतापराव पवार

पुणे - टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांना डी. लिट. पदवीने बुधवारी सन्मानित करताना डॉ. दीपक टिळक. या वेळी (डावीकडून) अभिजित जोशी, पवार, डॉ. टिळक आणि डॉ. गीताली टिळक-मोने.
पुणे - टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांना डी. लिट. पदवीने बुधवारी सन्मानित करताना डॉ. दीपक टिळक. या वेळी (डावीकडून) अभिजित जोशी, पवार, डॉ. टिळक आणि डॉ. गीताली टिळक-मोने.

पुणे - शिक्षण व्यवस्थेच्या विकासासाठी फक्त इच्छा असून चालत नाही, तर त्यासाठी प्रचंड राजकीय आणि सामाजिक इच्छाशक्ती आवश्‍यक असते. त्या माध्यमातून शिक्षण व्यवस्थेचा विकास करता येईल, असा विश्‍वास ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी बुधवारी येथे व्यक्त केला. 

टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे पवार यांना डी.लिट. पदवी प्रदान करण्यात आली. विद्यापीठाचे कुलपती डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते मानपत्र, स्मृतिचिन्ह देऊन ही पदवी प्रदान करण्यात आली. या वेळी प्रकुलगुरू डॉ. गीताली टिळक-मोने आणि कुलसचिव अभिजित जोशी व्यासपीठावर उपस्थित होते.

मर्यादित लोकांची प्रगती होण्यापेक्षा समाजाच्या सर्वांगीण प्रगतीचा ध्यास घेणे जास्त महत्त्वाचे आहे. विद्यापीठाचा यातील सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाला मिळालेल्या स्वायत्ततेचा उपयोग यासाठी करून घ्यावा, अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली.

आपल्याकडील सरकारी नियंत्रणे आणि नोकरशाहीमुळे शिक्षण व्यवस्थेतील सुधारणा खूप हळू होतात, हे स्पष्ट करताना ते म्हणाले, ‘‘हुशार विद्यार्थ्यांनाही रोजगार मिळत नाही. हे का होत आहे, हे न होण्यासाठी काय केले पाहिजे, खऱ्या अर्थाने गरजा काय आहेत, याचा विचार झाला पाहिजे.

परदेशात शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाचे धडे दिले जातात. आपल्याकडे अशा व्यवस्थेची आवश्‍यकता आहे. कौशल्य विकासाबाबत आपण फक्त बोलत आहोत. पण त्या दृष्टीने अजून ठोस पाऊल उचलले नाही. कौशल्य विकासासाठी पोषक वातावरण आपल्याकडे अद्याप नाही. पर्यटन, शेती आणि प्रक्रिया उद्योग ही आपली बलस्थाने आहेत. पण ती आपण उपयोगात आणू शकत नाही, याची खंत वाटते. याचा विकास झाल्यास तरुणांसाठी मोठी संधी निर्माण होऊ शकते.’’ शिक्षण संस्थांना स्वायत्तता आवश्‍यक आहे. वर्षानुवर्षे सुरू असलेल्या अभ्यासक्रमात स्वायत्ततेमुळे कालसापेक्ष बदल होत आहेत, ही चांगली गोष्ट आहे, असेही पवार यांनी सांगितले.

टिळक म्हणाले, ‘‘चांगल्या मानांकनासाठी विद्यापीठ प्रयत्नशील आहे. त्यासाठी पायाभूत सुविधांबरोबरच संशोधनाला प्रगत तंत्रज्ञानाची जोड देण्यात येत आहे.’’

टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे मिळालेला हा सन्मान मला विशेष महत्त्वाचा वाटतो. कारण लोकमान्य टिळकांच्या विचारांनी प्रेरित झालेल्या संस्थेकडून तो मिळाला आहे. टिळक हे छत्रपती शिवाजी महाराजांइतकेच प्रेरणास्थान आहे.
- प्रतापराव पवार, अध्यक्ष, सकाळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com