मुंबई - राज्याच्या यवतमाळ, वाशीम आणि जळगाव जिल्ह्यातील आठ तालुक्यांत राज्य सरकारने मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला असून, या तालुक्यांत सवलती लागू करण्यात आल्या आहेत.
यंदाच्या मान्सूनला दोन महिन्यांचा अवकाश असताना राज्यात अनेक भागांत पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. तसेच शेकडोंच्या संख्येने गावांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. गेल्या वर्षी राज्यात समाधानकारक पाऊस पडला असला तरी काही जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे. पर्जन्याची तूट, उपलब्ध असलेल्या भूजलाची कमतरता, मृदू आर्द्रता, पेरणीखालील क्षेत्र व पिकांची स्थिती या सर्व घटकांचा एकत्रित विचार करून आपत्तीची शक्यता विचारात घेऊन राज्य सरकारने आठ तालुक्यांत मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला.
मध्यम दुष्काळी तालुके (जिल्हानिहाय)
जिल्हा तालुके
यवतमाळ - राळेगाव, दिग्रस, घाटंजी, केळापूर, यवतमाळ
वाशीम - वाशीम
जळगाव - मुक्ताईनगर, बोदवड
या असतील सवलती
- जमीन महसुलात सूट
- सहकारी कर्जाची फेररचना
- शेतीच्या निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती
- कृषी पंपाच्या वीजबिलात 33.5 टक्के सूट आणि वीजजोडणी खंडीत करण्यास स्थागिती
- विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ
- रोजगार हमीची कामे, टॅंकरने पाणीपुरवठा
|