सरकार भोंदूंच्या दावणीला, विकास कसा होणार?

सरकार भोंदूंच्या दावणीला, विकास कसा होणार?

करमाळा : महाराष्ट्र हे पुरोगामी विचारांचे राज्य म्हणून सर्वत्र ओळखले जाते. अशा पुरोगामी विचाराच्या राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जेव्हा राज्यसत्ता चुकते तेव्हा धर्मसत्ता त्यावर अंकुश ठेवण्याचे काम करत असते, असे विधान करून राज्यसत्ता 
भोंदूबाबाच्या दावणीला बांधत असतील तर राज्याचा विकास कसा होणार? असा सवाल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित केला. 

 
करमाळा येथे नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर बुधवारी आयोजित मेळाव्यात श्री. पवार बोलत होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे अध्यक्षस्थानी होते. या वेळी माजी आमदार श्‍यामल बागल, जिल्हा परिषद अध्यक्षा जयमाला गायकवाड, उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख, जिल्हा बॅंकेच्या संचालिका रश्‍मी बागल, 'मकाई'चे अध्यक्ष दिग्विजय बागल, जिल्हा परिषदचे सभापती मकंरद निंबाळकर, पंचायत समिती सभापती सुवर्णा गाडे, उपसभापती कल्याणराव गायकवाड, महेश कांदे, अप्पाराव काटे, राजाबापू पाटील, "आदिनाथ'चे उपाध्यक्ष प्रदीपकुमार जाधव -पाटील, जिल्हा दूध संघाचे संचालक राजेंद्रसिंह राजेभोसले, अलका चौगुले, यशकल्याणीचे गणेश करे-पाटील, शंकरराव साळुंखे, बाळासाहेब पांढरे, प्रा. संजय जाधव ,अल्ताफ तांबोळी, श्रेणिक खाटेर, ज्ञानदेव देवकर, प्रा. संजय जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. 


श्री. पवार म्हणाले, की आमच्या सरकारने महाराष्ट्रातील अंधश्रद्धा घालवण्यासाठी कायदा केला. आज देशात रामदेव बाबा पतंजलीच्या माध्यमातुन हजारो कोटींची कमाई करतात. याचा विचार होणे गरजेचे आहे. या सरकारने नगरपालिका निवडणुकीसाठी लावलेली आचारसंहिता चुकीची आहे. जिथे चारपेक्षा जास्त नगरपालिकेच्या निवडणुका आहेत तेथे जिल्हाभर चार महिने आचासंहिता लागू करण्यात आली आहे. जर राज्यात चार महिने आचारसंहिता राहिली तर विकासकामे कशी होणार? जिथे निवडणुका तिथे आचारसंहिता हवी. 
जिल्हा बॅंकेच्या संचालिका रश्‍मी बागल-कोलते म्हणाल्या, करमाळा विधानसभा मतदारसंघातील करमाळा व कुर्डुवाडी नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वच्या सर्व 18 जागांसाठी उमेदवारांची तयारी आहे. करमाळा विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी उमेदवार निवडीचे अधिकार आम्हाला द्यावेत. भविष्यात करमाळा तालुक्‍यात राष्ट्रवादी अधिक बळकट करण्यासाठी निश्‍चितच प्रयत्न केला जाईल. आपल्या लोकांमुळे आपला पराभव होईल एवढे एखाद्याला मोठे करू नका, अशी मागणीही त्यांनी अजित पवार यांच्याकडे केली. या वेळी पक्षनिरीक्षक प्रदीप गारटकर, दशरथ कांबळे, हर्षल बागल, श्री. दळवी यांची भाषणे झाली. चंद्रशेखर जोगळेकर यांनी सूत्रसंचालन केले. चंद्रहास निमगिरे यांनी आभार मानले. 

बंदोबस्ताची वेळ माझ्यावर येऊ देऊ नका 
राष्ट्रवादीच्या काही पदाधिकाऱ्यांनी विधानसभेला पक्षाचे काम केले नाही. त्यामुळे पक्षाचा पराभव झाला. या कार्यकर्त्यांच्या तक्रारीवर बोलताना अजित पवार म्हणाले, ज्यांनी पक्षाचे काम केले नाही. त्यांना तुम्हीच उमेदवारी दिली. त्या वेळी माझी शिफारस नव्हती. यापुढे तरी योग्य व्यक्तींना उमेदवारी द्या. नाहीतर त्यांचा बंदोबस्त मला करायला लावू नका. 

50 लाखांत नगरसेवकही फुटत नाहीत 
पूर्वीच्या काळी खासदार, आमदार 50 लाखात फुटायचे. मात्र आता नगरसेवकही 50 लाखांत फुटत नाहीत. त्यामुळे उमेदवारी देताना थोडा विचार करा. घोडेबाजार करणाऱ्या उमेदवारांना तिकिटे देऊ नका. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com