मुंबई - विधान भवनाच्या प्रवेशद्वारासमोर शुक्रवारी (ता. 7) मुक्ताईनगर येथील तात्या देशमुख या शेतकऱ्याने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र विधान भवनाच्या प्रवेशद्वारासमोर हा प्रकार घडला नसल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
एकीकडे मुख्यमंत्री राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जामाफीची योग्य वेळ येऊ द्या, असे सांगत असतानाच राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र सुरू आहे. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पी अधिवेशनाचे सूप वाजत असतानाच या शेतकऱ्याने आपल्या मागण्यांसाठी आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांना जी. टी. रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. जी. टी. रुग्णालयाच्या निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. मोनिका यांनी याबाबत माहिती देण्यास नकार दिला.
पोलिस उपायुक्त मनोजकुमार यांनी सांगितले, की हा प्रकार कर्जामुळे झालेला नाही. दोन भावांच्या जमिनीच्या वादातून घडला आहे. उषा मेहता चौकातील पोलिसांना देशमुख यांनी आपण विष प्यायले, असे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती स्थिर आहे.
|