मुंबई - 'शेतकऱ्यांनी आत्महत्या करेपर्यंत वाट कसली बघता? सरकारने सुरवातीपासूनच खबरदारी घेतली असती, तर शेतकऱ्यांवर ही वेळच आली नसती,'' अशा शब्दांत राज्य सरकारवर हल्ला चढवत 'एकदा तरी शेतकऱ्यांची कर्जमाफी करा,'' अशी जोरदार मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी केली.
राज्यातील पेट्रोलचे वाढलेले दर, छत्तीसगडमध्ये झालेला नक्षलवाद्यांचा हल्ला यावरून मंगळवारी ठाकरे यांनी भाजपवर टीकेची झोड उठवत दिल्लीतील "डिनर डिप्लोमसी' अयशस्वी ठरल्याचे सूचित केले.
राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व मित्रपक्षांना दिल्लीत बोलावून सहभोजनाचा घाट घातला. या सहभोजनात आगामी लोकसभा निवडणूक एकत्र लढण्याचा निर्णय झाल्यावर शिवसेना शांत बसली होती; मात्र भाजपच्या या "डिनर डिप्लोमसी'चा फारसा उपयोग झाला नसल्याचे स्पष्ट झाले. "मातोश्री' या निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना ठाकरे यांनी पुन्हा भाजपला लक्ष्य केले. राज्यातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याची परिस्थिती आहे. कधी दुष्काळ, तर कधी पिकाला चांगला भाव नाही, अशा परिस्थितीत शेतकरी अडकला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना एकदा तरी कर्जमुक्त करा, अशी मागणी त्यांनी पुन्हा केली.
|