दिवंगत ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांच्या निधनानंतर सुरु करण्यात आलेला 'लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार' हा पहिला पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला होता. हा पुरस्कार वितरण सोहळा आज मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात पार पडला. या पुरस्कार वितरण सोहळ्याच्या वेळी काल दिग्गज मंडळींची उपस्थिती होती पण राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कार्यक्रमाला उपस्थित नसल्याने माध्यमात चर्चा सुरु झाल्या आहेत. पंतप्रधानांना जाहीर झालेल्या पुरस्काराच्या वितरण सोहळ्यात मुख्यमंत्र्यांना निमंत्रण नसल्याने ते गेले नव्हते. असाच काहीसा किस्सा १९९७ साली घडला होता. लता मंगेशकरांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला होता त्या पुरस्काराच्या वितरण सोहळ्यात तात्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांनाही आमंत्रण दिलं गेलं नव्हतं.
हा किस्सा आहे १९९७ सालचा. १९९५ साली महाराष्ट्रात भाजपा सेना युतीचं सरकार सत्तेवर आलं होत. त्यानंतर शिवसेनेचे मनोहर जोशी यांनी मुख्यमंत्री आणि भाजपाचे गापीनाथ मुंडे यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात आलं होतं. हे सरकार सत्तेत आल्यावर बाळासाहेब ठाकरे यांच्या पुढाकाराने १९९६ साली महाराष्ट्रभूषण हा पुरस्कार सुरु करण्यात आला होता. साहित्य, कला, क्रीडा, विज्ञान, आरोग्य, पत्रकारिता, समाजसेवा अशा क्षेत्रांमधील नामवंतांचा या पुरस्कारासाठी विचार केला जातो. पहिल्या वर्षीचा महाराष्ट्रभूषण पुरस्कार पु.ल. देशपांडे यांना जाहीर केला होता. दुसऱ्या वर्षी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना हा पुरस्कार जाहीर झाला होता.
पु.ल.देशपांडेंना पहिला महाराष्ट्रभूषण आणि बाळासाहेबांना पश्चाताप
पहिला महाराष्ट्र भूषण जेष्ठ साहित्यिक पु.ल.देशपांडे यांना जाहीर झाला होता. पुरस्कार प्रदान सोहळ्याच्या वेळी त्यांनी बाळासाहेबांवर टीका केली होती. त्यानंतर त्यांच्या या टीकेमुळे मोठं वादळ निर्माण झालं होतं. त्यानंतर झक मारली अन् तुम्हाला महाराष्ट्र भूषण दिला अशा शब्दांत बाळासाहेबांनी त्यांना प्रत्युत्तर दिले होते. त्यानंतर महाराष्ट्रात मोठा वाद निर्माण झाला होता.
सरकारमधले तात्कालीन सांस्कृतीक मंत्री अनिल देशमुख यांच्या आग्रहामुळे नागपूरात या पुरस्काराचा वितरण समारंभ आयोजित केला होता. २० नोव्हेंबर १९९७ ला या पुरस्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरु होती. शिवसेनेच्या आणि भाजपाच्या नेत्यांची गर्दी या कार्यक्रमाला होती. त्यावेळी लता मंगेशकरांनी 'मोगरा फुलविला' या गाण्याने प्रेक्षकांचे कान मंत्रमुग्ध केले होते.
कार्यक्रमादरम्यान भाषण करताना लता म्हणाल्या होत्या की, असंख्य पुरस्कारांमध्ये आज मिळालेला महाराष्ट्रभूषण हा पुरस्कार माझ्या दृष्टीने भारतरत्नप्रमाणेच सर्वोच्च आहे. तो माझ्या महाराष्ट्राचा, माझ्या मातीचा पुरस्कार आहे. तो मी नम्रपणे स्वीकारीत आहे." असं म्हणून त्यांनी या पुरस्कार स्वीकारला होता. पण या मोठ्या कार्यक्रमात राज्याचे तात्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे हे कुठं दिसत नव्हते.Chandramukhi: गोपीनाथ मुंडे यांचं बरखा पाटील प्रकरण काय होतं माहितीये?
जिथं आमंत्रण नाही तिथे आपण नाही...
या पुरस्काराच्या वितरण समारंभासाठी तात्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांना आमंत्रण दिलं गेलेलं नव्हतं त्यामुळे त्यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली नव्हती. त्यानंतर पत्रकारांनी त्यांना याबद्दल विचारले असता ते म्हणाले की, "गेल्या वर्षी पु.ल.देशपांडे यांना महाराष्ट्र भूषण देण्याच्या मुंबईतील कार्यक्रमाला निमंत्रण असल्यामुळे आपण उपस्थित होतो व तेथे भाषणदेखील केले होते, पण यावर्षी मला समारंभाचे निमंत्रणच नव्हते त्यामुळे मी गेलो नाही." असं पत्रकारांना बोलताना म्हणाले.
राज्य शासनाच्या महत्त्वाच्या सोहळ्याचे निमंत्रण नसल्याची नाराजी त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती आणि निमंत्रण नसल्याने ते दिवसभर मंत्रालयातंच होते. मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावर ते गावाच्या पाणीप्रश्नावर बैठक घेत होते. त्यानंतर या प्रकरणाच्या चर्चा माध्यमांत रंगल्या होत्या. राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना सरकारी कार्यक्रमाला निमंत्रण न दिल्याने उलट सुलट चर्चा सुरु झाल्या होत्या.
अशी दूर झाली नाराजी
एवढ्या मोठ्या कार्यक्रमात चक्क उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रण नसल्याने गोपीनाथ मुंडे नाराज झाले होते. त्यातच महाराष्ट्रात युतीचे सरकार असल्याने शिवसेनेला आणि सरकारला भाजपाच्या या मोठ्या नेत्याची नाराजी परवडणारी नव्हती त्यामुळे शिवसेनेचे तात्कालीन सांस्कृतीक कार्यमंत्री प्रमोद नवलकर यांनी दुसऱ्या दिवशी गोपीनाथ मुंडे यांची भेट घेऊन समजूत काढली आणि या प्रकरणाला तिथेच पूर्णविराम मिळाला.
संदर्भ :- सकाळ वर्तमानपत्र,
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.